अहमदपूर हा ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचा गृहतालुका. मात्र, अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना कधीही चाकूरकर यांना कौल देता आला नाही. कारण हा मतदार संघ पुनर्रचनेपूर्वी (2009) नांदेड लोकसभा मतदारसंघाशी जोडला गेलेला होता. या मतदारसंघात चाकूरकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांचा प्रभावही तसाच मोठा आहे, असे असले तरी दोन्ही तालुक्यात नेहमीच काँग्रेस विरोधात कौल देण्याचा रिवाज आहे. अहमदपूर मतदारसंघ निर्मितीनंतर झालेल्या एकूण बारा निवडणुकांपैकी फक्त चार वेळा काँग्रेसने आणि आठ वेळा विरोधी पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. त्यात तीन वेळा मतदार अपक्षासोबत राहिला आहे. 2014 साली मोदी लाटेत या भागाने अपक्ष उमेदवार विनायक पाटील यांना निवडनू दिले, यातच या मतदारसंघाची वृत्ती रंग आणि रुप दिसून येते.


कायम सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाणारी मानसिकता असलेला मतदारसंघ. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला सलग दुसरी संधी न देणारा मतदार संघ अशी अलीकडील तीन दशकात वेगळी ओळख जपणारा अहमदपूर मतदारसंघ जिल्ह्यात कायमच चर्चेत राहिला आहे. येथील शैक्षणिक पॅटर्न हे कायम असून उद्योग, व्यापार, एमआयडीसी, कारखानदारी इत्यादी रोजगार निर्मितीक्षम आघाडीवर वजाबाकीत गेलेला मतदारसंघ. निसर्गाच्या अवकृपेने शेती व्यवसायात मागे पडलेला. नांदेड आणि परभणी जिल्ह्याला लागून असलेला हा भाग स्थायी नेतृत्वाअभावी अनेक नेत्याच्या झुंडीत हरवला आहे. त्यामुळे  विकासापासून लांब राहिला आहे. बेरोजगारी पाचवीला पुजलेली. या भागातील अनेक गावात ऊसतोडणी कामगार आहेत. वंजारी समाजाची संख्या लक्षणीय आहे. मुस्लिम समाजही मोठा आहे. लिंगायत समाजाचा मोठा प्रभाव आहे. हिंदू असो की मुस्लिम, सवर्ण किंवा दलित, मराठा असो की ओबीसी जात-धर्माच्या पलीकडे जाऊन अहमदपूर-चाकूर मतदार संघात राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा शब्द प्रमाण मानला जातो.  यामुळे जातीय समीकरणे येथील निवडणुकीत प्रभावी ठरली आहेत

2009 साली रिडालोसकडून निवडून आलेले बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांना 2014 साली अपक्ष उमेदवार विनायक पाटील धूळ चारत विजय मिळवला होता. राष्ट्रवादी, भाजप, सेना  आणि काँग्रेस यांच्या युद्धात अवघ्या चार हजार मताधिक्क्याने विजय मिळवला होता. अलीकडेच विनायक पाटील यांनी भाजपात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री यांनी अहमदपूरकडे खास लक्ष दिले. मोठ्या प्रमाणात निधी दिला. रस्ते विकासकामे होत आहेत. शेती, पिण्याचे पाणी, उच्चशिक्षण, बेरोजगारी निर्मूलनासाठी उद्योग, व्यवसाय, कारखानदारीचा अभाव आदी काही कळीचे प्रश्न इथे आ वासून आहेत.

जातीय समीकरणे मुस्लिम दलित मते लक्षणीय आहेत. धनगर मराठा लिंगायत आणि वंजारी मते निर्णायक ठरणारी आहे. कोणताही समाजा एक गठ्ठा मतदान करत नाही. येथे उमेदवार पाहून निर्णय घेण्याची वृत्ती प्रबळ आहे. याचा परिणाम वंचित बहुजन आघाडीचा योग्य उमेदवार मिळाल्यास राष्ट्रीय आणि राज्यस्तवरील पक्षाला फटका बसू शकतो.

विनायकराव  पाटील यांची जमेची बाजू त्याचे मनमिळावू व्यक्तिमत्व.  सर्वाना सहज भेटणारे, गटातट नव्हे तर लोकात राहणारा माणूस अशी ओळख आहे. मात्र विनायकरावांचे भाजपात आगमन झाल्याने भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या हक्काच्या जागेवरून वाद उठला आहे. भाजपात इच्छूकांची भाऊगर्दीची यादी 25 पर्यंत गेली आहे. येथे बंडाचे निशाण उभे राहणार आहे. तिकीट नाही मिळाल्यास भाजपातील अनेक जण पक्षाच्या विरोधात छुपा अजेंडा राबवतील. हीच या मतदार संघाची आजपर्यंतची परंपरा कायम राहणार अशी स्थिती आहे. मुंढे गट कायमच येथे सक्रिय राहिला आहे.  नुकतचं जिल्ह्यावर पकड निर्माण करण्यासाठी तयारीत असलेले संभाजी पाटील निलंगेकर यांचाही गट येथे सक्रिय होताना पहावयास मिळत आहे. यासर्वाना अनुकूल करुन घेण्याशिवाय विनायकराव पाटलाकडे पर्याय नाही. त्यात ते कितपत यशस्वी होतात यावरच सर्व गणिते अवलंबून आहेत.

जागावाटपाबाबतची समिकरणं

आघाडीत जागा राष्ट्रवादीला

युतीत जागा भाजपाला

2014 विधानसभेची आकडेवारी

विद्यमान आमदार - विनायक पाटील (अपक्ष) सध्या आता भाजपात आहेत

अपक्ष - विनायकराव पाटील - 61,957

राष्ट्रवादी - बाबासाहेब पाटील - 57,951

भाजप - गणेश हाके - 53,919

इंदिरा काँग्रेस - 11,404

बसपा - 9409