Sangli Crime: सांगली जिल्ह्यात (Sangli News) ऑनर किंलीगची घटना घडली आहे. मुलीच्या प्रेमप्रकरणास वडिलांनी विरोध करत निर्घृण खून केल्याची घटना जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील मंगरूळमध्ये शनिवारी घडली. प्रेमप्रकरणास वडिलांचा असलेला विरोध आणि मुलगी सांगूनही ऐकत नाही, म्हणून चिडून वडिलांनीच खून केला. श्रेया संतोष जाधव (वय 17) असे मयत मुलीचे नाव आहे. संतोष जगन्नाथ जाधव, असे श्रेयाच्या वडिलांचे नाव असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नात्यातील युवकासोबत प्रेमसंबंध 


मयत श्रेयाचे नात्यातीलच एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या प्रेमसंबंधाला वडिलांचा त्याला विरोध होता. त्यावरून वडिलांनी श्रेयाचे कॉलेजला जाणेही बंद केले होते. त्यामुळे 1 जुलै रोजी शनिवारी श्रेया कॉलेजला जाण्याचा हट्ट करीत होती. मात्र, वडिलांनी तिला संबंधित मुलाशी न भेटण्याची अट घातली होती. यावेळी आई आणि वडिलांनी तिला वय पूर्ण होईपर्यंत थांब मग लग्न करूया, असे सांगितले. मात्र, श्रेया काहीही ऐकण्याच्या मन: स्थितीत नव्हती. यावरून वाद झाल्यानंतर वडिल संतोष यांनी रागाच्या भरात समोर असणारा भाजी चिरण्याचा चाकू घेऊन श्रेयावर हल्ला केला. 


वडिलांनी केलेल्या हल्ल्यात श्रेया गंभीर जखमी झाली होती. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तिच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी मृत श्रेयाचे वडील संतोष जाधवच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


जमिनीच्या वादातून चुलत भावाकडून भावाचा खून


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत भावाने भावाचा खून केल्याची घटना सांगली (Sangli) जिल्ह्यात घडली होती. आहे. मिरज तालुक्यातील बेडगमध्ये सोमवारी (19 जून) रात्री आठ ते नऊच्या सुमारास ही घटना घडली होती. हत्या केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बंडू शंकर खरात (वय 50 वर्षे) असं मृताचं नाव आहे तर सचिन बबन खरात (वय 30 वर्षे) असं आरोपीचं नाव आहे.  


मिरज तालुक्यातील मल्लेवाडी रस्त्यावर खरात वस्ती इथे ही घटना घडली. आरोपी सचिन खरातने बंडू खरात यांच्या मानेवर, तोंडावर, पाठीवर घाव घातले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी त्वरित दाखल झाले. या खुनात वापरलेली कुऱ्हाडही जप्त करण्यात आली आहे. बंडू खरात यांचा चुलत भाऊ सचिन खरात यांच्याशी जमिनीचा वाद सुरु होता. सोमवारी रात्री वाद विकोपाला गेला. त्याचे पर्यवसान खुनामध्ये झालं. 


इतर महत्वाच्या बातम्या :