Sangli Crime News : सांगली (Sangli) जिल्हा हादरवून टाकणाऱ्या आश्रम शाळेतील मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात मुख्य आरोपी अरविंद आबाजी पवार (रा. मांगले, ता. शिराळा), मनीषा शशिकांत कांबळे (रा. चिकुर्डे) यांना न्यायालयाने एकाच गुन्ह्यामध्ये 4 वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अरविंद हा आश्रम शाळेचा संस्थापक असून, मनीषा कांबळे आश्रमशाळेतील स्वयंपाकीण आहे. दोघांनी मिळून मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी करळप पोलिस ठाण्यात 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात जिल्हा न्यायाधीश अनिरूद्ध गांधी यांनी आरोपींना एकाच गुन्ह्यात चार वेळा जन्मठेपीची शिक्षा सुनावली असून, ही जिल्ह्यातील पहिलीच शिक्षा ठरली आहे. तसेच न्यायालयाने 4 पिडीत मुलींना दंडातील 50 हजार रक्कम देण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे एका निनावा पत्राने या मुलींवर अत्याचार प्रकरणाला वाचा फुटली होती.


नेमकं काय आहे प्रकरण? 


मुख्य आरोपी अरविंद पवार कुरळप येथे मिनाई आश्रमशाळा चालवत होता. या आश्रमशाळेमध्ये निवासी वस्तीगृहात अनेक मुली शिक्षण घ्यायच्या आणि पिडीत मुली देखील याच आश्रमशाळेत शिकत होत्या. संस्थापक अरविंद पवार व तेथे कामाला असणारी मनिषा कांबळे हे दोघे मिळून आश्रमशाळेत असलेल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करायचे. अनेक मुलींचे विनयभंग देखील करण्यात आले. दरम्यान, याची माहिती करळप पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांना मिळाली. त्यांनी या सर्व प्रकरणाची खात्री करत त्यांनी दोघांवर 27 सप्टेंबर 2018 रोजी गुन्हा दाखल केला. पुढे दोन्ही आरोपींच्या विरोधात तब्बल 350 पानांचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. न्यायालयाने पुरावे आणि साक्षीदार तपासले. सुनावणीच्या सुरूवातीला जिल्हा न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्यापुढे सुनावणी झाली. यानंतर हे काम जिल्हा न्यायाधीश सतीश चंदगडे यांच्यापुढे चालले. त्यानंतर जिल्हा न्यायाधीश अनिरूद्ध गांधी यांच्यापुढे सुनावणी सुरू होती. शेवटी यावर निकाल आला असून, दोन्ही आरोपींना दोषी ठरवत आरोपींना एकाच गुन्ह्यात चार वेळा जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे.


निनावा पत्रान वाचा फुटला


आश्रमशाळेत विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे निनावी पत्र करळप पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांना पिडीत मुलींनी 25 सप्टेंबर 2018 रोजी पाठवले होते. मुलींवर अरविंद पवार आणि मनिषा कांबळे अत्याचार करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, असे पत्रात लिहिले होते. याची माहिती चव्हाण यांनी तात्काळ सहायक पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांना दिली. यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पाटील यांना तत्काळ पल्लवी चव्हाण यांना साध्या वेशातशाळेत पाठवून पडताळणी केली. ज्यात अरविंद पवार आणि मनिषा कांबळे मुलींवर अत्याचार करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. 


नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया 


या प्रकरणावर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची देखील प्रतिक्रिया आली आहे."सांगली आश्रमशाळेतील विद्यार्थिनींवर बलात्कार घटनांच्या केसमध्ये जि.न्यायालयाने अरविंद पवार व सहायिका शशीकला कांबळे यांना चारवेळा जन्मठेप व 4 मुलींना दंडाची रक्कम दिली. न्यायालयाचे मी आभार मानते. पिडीत मुलींना 6 वर्षांनी न्यायाचा प्रकाश मिळाला असल्याचे,” नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी : 8 महिला पोलिसांवर 3 वरिष्ठांकडून अत्याचार, पत्रातून खळबळजनक दावा, मात्र व्हायरल पत्र फेक असल्याचा दावा