नवी मुंबई : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटमध्ये एका टेम्पोला आग लागल्याची घटना घडली होती. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी चार लोकांना अटक केली आहे. या लोकांनी संबंधित टेम्पोला आग लावल्याचं सीसीटीव्ही फूटेजमधून स्पष्ट झालं आहे. 


संबंधित टेम्पोमध्ये प्लॅस्टिकचे क्रेट्स होते. 3 जुलैच्या मध्यरात्री नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या टेम्पोला आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत तो टेम्पो जळून खाक झाला होता. सीसीटीव्ही फूटेजचा तपास केल्यानंतर पोलिसांनी अब्बास सत्तार खान आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. 


टेम्पो मालक असलेल्या राजीव कुमार यादव या व्यक्तीने अब्बास खान याच्याकडून टेम्पो विकत घेतला होता. या व्यवहारामुळे या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. गाडीचे पूर्ण पैसे घेऊनही अब्बासने आपल्या नावावर गाडी केली नसल्याचं राजीव कुमारनं सांगितलं. या वादाचे रुपांतर हाणामारीतही झालं होतं. त्यावेळी अब्बास याचा मुलगा रमजान याने राजीव कुमारला मारहाण केली होती अशी माहिती आहे. 


3 जुलैच्या मध्यरात्री टेम्पोला आग लागल्याची माहिती मालक राजीव कुमारला मिळाली. तो घटनास्थळी पोहोचेपर्यंत गाडी जळून खाक झाली होती. या प्रकरणी आपल्या गाडीला आग लागली नसून ती लावण्यात आल्याची तक्रार राजीव कुमारने पोलिासांना दिली आणि तशी तक्रार नोंद केली. त्यानंतर अधिक तपास करत पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. त्यातून अब्बास खान, त्याचा मुलगा आणि इतर दोघांनी ही आग लावल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अब्बास आणि त्याच्या इतर तिघांना अटक केली आहे. 


महत्वाच्या बातम्या :