भिवंडी : राज्य शासनाने गाय तसेच गोवंश हत्येला बंदी घातली असतांनाही चारचाकी वाहनातून चोरट्या मार्गाने गायीची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे भिवंडीत वारंवार समोर येत आहेत. भिवंडीतील नदीनाका येथे चारचाकी वाहनातून गायींची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या समोर आला. त्यांनतर पोलिसांनी गायी पळविणारी ही टोळी ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केला असता आरोपींनी गाडी सोडून पळ काढला. मात्र गायींना गाडीत कोंबून पळविणाऱ्या टोळीच्या मागे लागलेल्या पोलिसांचा थरार पाठलाग एका पेट्रोल पंपावरच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


विशेष म्हणजे गाडीचे नंबर प्लेट बदलून या गायी बाहेरून विकत आणल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आला असून याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात वाहन चालकासह एकूण पाच जणांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांच्या सतर्कतेने वाहनातील तीन गायींना जीवनदान मिळाले असून त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहे.


भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शेलार नदी नाका परिसरात तालुका पोलिसांनी ऑल आऊट मोहीम राबवून सकाळपासून नाकाबंदी केली होती. या नाका बंदीत एक तवेरा कंपनीची सफेद रंगाची गाडी अडवली असता पोलिसांना पाहून गाडीतील आरोपींनी गाडीतून लगेच उड्या मारून पळ काढल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला.


मात्र सर्वच आरोपी पळून जाण्यास यशस्वी ठरले. त्यांनतर पोलिसांनी गाडीची झाडाझडती घेतली असता या गाडीतील मागच्या बाजूच्या सीट मध्ये फेरबदल करून तीन जिवंत गायी आढळल्या. या गायींमध्ये 10 हजार रुपये किंमतीची पाच वर्षाची एक गीर जातीची गाय, दहा हजार रुपये किंमतीची जर्सी गीर क्रॉस जातीची 3 वर्ष वयाची गाय तसेच एक 12 हजार रुपये रक्कमेची चार वर्ष गावठी गीर गाय अशा एकूण 32 हजार रुपये किंमतीच्या तीन जिवंत गायी आढळल्या.


पोलिसांनी सदर गाडी जप्त करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून स्थानिकांच्या मदतीने गायीची सुटका केली. याप्रकरणी अब्दुल्ला मौला शेख ( रा . नवी वस्ती ) गुड्डू , नदीम , जमील , तसेच गाडी मालक अशा पाच जणांवर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल धनंजय राजेंद्र बेरे यांनी गुन्हा दाखल केला असून तालुका पोलीस या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.