Pradhan Mantri Fasal Bima Yojana : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharama) यांनी मोदी सरकारच्या (Modi Govt) दुसऱ्या कार्यकाळातील अंतरीम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी विविध योजनांची घोषणा केली आहे. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा 4 कोटी शेतकऱ्यांना लाभ दिला असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. दरम्यान प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे नेमकं काय? या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळतो, या योजनेची वैशिष्ट्ये काय? याबाबत सविस्तर माहिती पाहुयात.


शेतकऱ्यांच्या पिकांचे अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांच्या नुकसान. या झालेल्या नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. नैसर्गीक संकटाचा दरवर्षी शेतकऱ्यांना फटका बसतो. शेतकऱ्यांची उभी पिकं यामुळं वाया जातात. अशा स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना सरकारने सुरु केली आहे. 


'या' कारणामुळं झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण


हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळं पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळं होणारं नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळं पिकांचं होणारं नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंत कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट वादळ चक्रीवादळ, पुरक्षेत्र जलमय होणे, भुसखलन, दुष्काळ पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे पिकांचे होणारे नुकसान आणि नैसर्गीक कारणांमुळे पिकाचे होणारे काढणी पश्चात नुकसान अशा जोखमीच्या कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाते.  


ई-पीक पाहणी अंतर्गत पीकांची नोंद करण्यात यावी. विमा योजनेत विमा घेतलेले पीक आणि ई-पीक पाहणीमध्ये नोंदवण्यात आलेलं पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उदभवल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदवण्यात आलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा, राष्ट्रीयकृत बँकेचा शाखा, नजिकचे विविध कार्यकारी सोसायट्या, कृषी खात्याचे कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.


1 रुपयात पीक विम्यासाठी अर्ज 


महाराष्ट्रात 2016 च्या खरिप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. आता महाराष्ट्र सरकारनं या योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन बदलांनुसार, सर्वसमावेशक पीक विमा योजना पुढच्या 3 वर्षांसाठी राज्यात राबवण्याचा महाराष्ट्र सरकारनं निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयात पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के, रबी हंगामासाठी 1.5 टक्के आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्के एवढा हप्ता भरावा लागायचा.
ही रक्कम, 700, 1000, 2000 पर्यंत प्रतिहेक्टरी जायची. आता शेतकरी 1 रुपया भरुन योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत. शेतकरी हप्त्याची उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार आहे. कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आली आहे. याशिवाय भाडेतत्त्वार शेती करणारे शेतकरीही या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.


'या' पिकांसाठी विमा संरक्षण लागू


खरिप हंगामातील भात (धान), खरिप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भूईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, खरिप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल. तर रबी हंगामातील गहू, रबी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भूईमूग, रबी कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू असेल. तुम्ही स्वत: पीक विमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता किंवा CSC सेंटरवर जाऊन अर्ज करू शकता.


महत्वाच्या बातम्या:


अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळालं? सविस्तर माहिती एका क्लिकवर