Post Office Schemes: भारतीय टपाल विभागाकडून अशा अनेक योजना राबवल्या जातात, ज्यांच्या मदतीने पैशांची सेव्हिंग करू शकता. अडचणीच्या काळात हेच पैसे कामाला येतात. यामध्ये पोस्ट ऑफिसच्या अनेक स्मॉल सेव्हिंग स्किमचा (Post Office Small Saving Schemes) समावेश आहे. पोस्ट ऑफिसची जन सुरक्षा योजनादेखील अशाच एका योजनेचा भाग आहे. जन सुरक्षा योजनेत आणखी तीन योजनांचा समावेश होतो. पंतप्रधान जीवन ज्‍योती विमा योजना (PM Jeevan Jyoti Yojana), पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PM Bima Suraksha Yojana) आणि अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme) अशी या तिन्ही योजनांची नावे आहेत. या योजनांचा नेमका फायदा काय? सामान्य माणसाला या योजनेतून नेमके काय मिळते? हे जाणून घेऊ या..


पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना


हा एका प्रकारचा टर्म इन्शुरन्स प्लॅन आहे. योजनेत गुंतवणूक करणाऱ्याचा मृत्यू झाल्यावर या योजनेअंतर्गत त्याच्या कुंटुबीयांना आर्थिक मदत दिली जाते. ही आर्थिक मदत दोन लाख रुपये असते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी वर्षाला फक्त 436 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच महिन्याला 36.3 रुपये देऊन तुम्ही दोन लाख रुपयांचा टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदी करू शकता. 18 ते 50 वर्षापर्यंतची कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. 


पंतप्रधान सुरक्षा विमा योजना


ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, अशा लोकांसाठी ही योजना सर्वांत चांगला पर्याय आहे. या योजनेची सुरुवात 2015 साली करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत अपघात झाल्यावर 2 लाख रुपयांपर्यंत विमा कव्हर मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वर्षाला फक्त 20 द्यावे लागतात. गरीब लोकांसाठी ही योजना फायदेशीर आहे. दुर्घटनेत संबंधित विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विम्याचे दोन लाख रुपये मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना दिले जातात. दुर्घटनेत विमाधारक दिव्यांग झाल्यास त्याला नियमाअंतर्गत त्याला 1 लाख रुपयांची मदत दिली जाते. 18 ते 70 वर्षांपर्यंतची कोणतीही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. वयाची 70 वर्षे पूर्ण झाल्यावर या योजनेचा लाभ घेता येत नाही. 


अटल पेन्शन योजना


पोस्ट ऑफिसची ही एक प्रसिद्ध योजना आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजेच म्हातारपणी आर्थिक अडचण येऊ नये असे वाटत असेल तर या योजनेत पैशांची गुंतवणूक करणे चांगला पर्याय आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला 5000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळऊ शकते. तुम्ही या योजनेत किती रुपये गुंतवता त्यानुसार तुम्हाला किती पेन्शन मिळणार हे ठरवले जाते. कर भरत नसलेला कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभार्थी होऊ शकतो. या योजनेसाठी वयाची अट ही 18 ते 40 वर्षे आहे. 


हेही वाचा :


पैसे घेऊन तयार राहा, आता आला 'हा' नवा आयपीओ, देणार तगडे रिटर्न्स!


पीएसयू सेक्टरमधला 'हा' स्टॉक देणार तगडे रिटर्न्स, आता गुंतवलेले पैसे तीन वर्षांत होणार दुप्पट?


शेअर मार्केटमध्ये आला नवा स्कॅम, 'पिग बुचरिंगचे' शिकार झाल्यास होणार बँक खाते रिकामे!