मुंबई: रिलायन्स उद्योग समूह आता भारतात कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (Artificial Intelligence) विकासाचं मॉडेल विकसित करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी केली. त्या माध्यमातून भारतातील प्रत्येक नागरिकाला, कोणत्याही ठिकाणी आणि कधीही AI चा वापर करता येऊ शकेल असं कंपनीचं ध्येय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. रिलायन्सच्या 46 व्या एजीएमला (Reliance AGM 2023) संबोधित करताना त्यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली. 


रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धमत्ता तंत्रज्ञानाचा विकास करण्यात येणार असून त्याचा सर्व नागरिक, व्यवसायिक आणि सरकारला लाभ होणार आहे. हे मॉडेल विकसित करणे हे जिओसाठी सर्वाधिक रोमांचकारी असेल असं मुकेश अंबानी म्हणाले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शाश्वत पद्धती आणि हरित भविष्याचा अवलंब करताना, क्लाउड आणि एज अशा दोन्ही ठिकाणी 2,000 मेगावॅट एआय-रेडी कम्युटर कॅपॅबिलिटी निर्माण करण्याची कंपनीची वचनबद्धता असल्याचं मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केलं. 


जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची क्रांती


जागतिक स्तरावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची क्रांती उदयास येत आहे. त्याचा परिणाम हा जगभरातल्या अर्थव्यवस्था, उद्योग तसेच नागरिकांच्या रोजच्या जीवनावर अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात होणार आहे. त्यामुळे येत्या काळात जगाशी स्पर्धा करायची असेल तर भारतानेही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून विकास, इनोव्हेशन आणि समृद्धता वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केलं. 


देशाचा विकास आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून 


मुकेश अंबानी म्हणाले की, सर्वांना आणि सर्व ठिकाणी ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पोहोचवली जाईल असं वचन मी सात वर्षांपूर्वी देशातल्या नागरिकांना दिलं होतं. आज जिओच्या माध्यमातून मी वचन देतो की येत्या काळात सर्वांना आणि सर्व ठिकाणी AI चा लाभ घेता येईल अशी सेवा जिओ विकसित करणार आहे. आपल्या देशातल्या समस्यांचे निराकरण हे AI च्या माध्यमातून केलं जाईल, AI हेच देशाच्या विकासाचं नवं माध्यम असेल. त्यामुळे देशातल्या सर्व नागरिकांना, उद्योगांना आणि सरकारला AI चा जास्तीत जास्त लाभ (Jio promises AI To Everyone, Everwhere)  कसा देता येईल याकडे रिलायन्सचा प्रयत्न असेल. 


आपल्या देशात बुद्धीमत्तेची कमतरता नाही असं मुकेश अंबानी म्हणाले. ते म्हणाले की, "येत्या काळात AI च्या विकासासाठी आपल्याला डिजिटल पायाभूत सुविधांची गरज मोठ्या प्रमाणात लागणार आहे. या क्षेत्राचा जसजसा विकास होईल तसतसे आम्ही क्लाऊड आणि एज लोकेशन्सच्या क्षमतेमध्ये 2000 मेगावॅटपर्यंत वाढ करू. येत्या पाच वर्षात रिलायन्सच्या बहुतांशी कंपन्यांमध्ये हरित उर्जेचा वापर करण्यास प्राधान्य देऊ. त्यामुळे केवळ शाश्वत विकास साधला जाणार नाही तर त्यामुळे उत्पादन खर्चही अत्यंत कमी होणार आहे." 


ही बातमी वाचा: