End of Festive Season : देशातील सणांचा हंगाम (festive season) आता संपला आहे. नवरात्रीपासून सणांचा हंगाम सुरु होऊन दिवाळी (Diwali) तुळशीच्या लग्नापर्यंत असतो. त्यामुळं बाजारपेठांमध्ये (Market) उत्साह भरला होता. या काळात झपाट्याने वाढणाऱ्या मागणीमुळं व्यापाऱ्यांना अधिकाधिक माल गोळा करणे भाग पडले होते. आता मात्र, दिवाळी संपल्यानं बाजारपेठांकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. आता खरेदीवर पैसे खर्च करायला कोणी तयार नाही. त्यामुळेच देशातील जवळपास सर्वच बाजारपेठांमध्ये सध्या शांतता आहे. त्यामुळं सध्या FMCG किरकोळ विक्रेते आणि वितरकांकडे करोडो रुपयांचा माल अडकला आहे.


दिवाळीनंतर बाजारपेठा थंडावल्या 


एफएमसीजी क्षेत्रातील किरकोळ विक्रेते आणि वितरकांकडे करोडो रुपयांचा माल अडकला आहे. पुरवठा साखळी केव्हा सुरळीत होणार आणि त्यांचे अडकलेले पैसे परत कधी मिळणार, याची चिंता त्यांना सतावत आहे. यंदा सणासुदीच्या काळात अपेक्षित मागणी नव्हती, असे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे. या अपेक्षेनुसार किरकोळ विक्रेते आणि वितरकांनी माल जमा केला होता. मात्र आता मागणी नगण्य झाल्याने अडचणीचे ठरले आहे. दिवाळीपर्यंत खरेदीसाठी लोकांचा उत्साह कायम होता. मात्र, त्यानंतर बाजारपेठा थंडावल्या आहेत. बिस्किटे, चॉकलेट आणि कन्फेक्शनरी सेगमेंटमध्ये मागणी सर्वात कमी झाली आहे. दिवाळीनंतर गिफ्ट पॅक अडकून पडले आहेत. त्यांची मागणी सर्वात कमी होती.


सर्वात वाईट स्थितीत सौंदर्य आणि कॉस्मेटिक उत्पादने


सौंदर्य आणि कॉस्मेटिक उत्पादनांना सर्वात वाईट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. तसेच, साबण आणि डिटर्जंट देखील फार चांगल्या स्थितीत नाहीत. त्यांच्या आजूबाजूला भरपूर साठा पडून आहे. यामध्ये अडकलेला पैसा किरकोळ विक्रेते आणि वितरकांसाठी त्रासदायक ठरत आहे. पूर्वी एक ते दोन आठवड्यांत माल पोहोचवला जायचा, आता तो माल पोहोचायला एक महिना लागत आहे. आकडेवारीनुसार, देशात सुमारे चार लाख वितरक आणि स्टॉकिस्ट आहेत.


कंपन्या स्वस्त पॅक लॉन्च करण्याच्या तयारीत 


ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांना ही परिस्थिती चांगलीच माहिती आहे. त्यामुळं ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि लहान कंपन्यांसमोर एक आव्हान आहे. सणानंतर ग्रामीण भागातील मागणी झपाट्याने घटली आहे. मात्र, या गोष्टींचा सामना करण्यासाठी कंपन्या स्वस्त पॅक लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. सध्या मात्र, मागणी कमी झाल्यानं मोठ्या प्रमाणात माल बाजारपेठांमध्ये शिल्लक आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


पाच राज्यांतील निवडणुका ठरवणार बाजाराची दिशा, नेमकी काय असणार स्थिती