Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडल्यानंतर आता हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आता देशभरातून भाविक आणि पर्यटक येण्याची शक्यता आहे. राम मंदिराच्या निर्मितीचा फायदा हा उत्तर प्रदेशच्या पर्यटन क्षेत्राला (Uttar Pradesh Tourism) होणार असून राज्याच्या महसुलात जवळपास 20 ते 25 हजार कोटींची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


केंद्र सरकारच्या योजनेचा फायदा यूपीला


एसबीआयच्या अहवालानुसार, अयोध्येतील राम मंदिर आणि इतर पर्यटन योजनांमुळे उत्तर प्रदेशचा कर महसूल 20 हजार कोटी रुपयांनी वाढून 25 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. केंद्र सरकारच्या तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि अध्यात्मिक हेरिटेज ऑगमेंटेशन ड्राइव्ह (प्रसाद) योजनेचा उत्तर प्रदेशला खूप फायदा होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.


यूपीमध्ये पर्यटकांचा खर्च दुप्पट होईल


उत्तर प्रदेशातील पर्यटकांची संख्या आणि त्यांचा होणारा खर्च हा आता दुपटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2022 मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी उत्तर प्रदेशमध्ये 2.2 लाख कोटी रुपये खर्च केले होते. विदेशी पर्यटकांनी राज्यात 10 हजार कोटी रुपये खर्च केले होते. एसबीआयच्या अहवालानुसार, पर्यटनाला चालना देण्यासाठी राम मंदिर आणि इतर योजनांच्या आधारे राज्यातील पर्यटन खर्च यावर्षी 4 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाऊ शकतो.


यूपीची अर्थव्यवस्था इतकी होईल


एसबीआयच्या अहवालात उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेबद्दलही काही नोंदी करण्यात आल्या आहेत. अहवालात असे म्हटले आहे की 2027-28 या आर्थिक वर्षात देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सची होईल तोपर्यंत उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था 500 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडू शकते. नॉर्वेसारख्या देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या आकारापेक्षा हे प्रमाण जास्त असेल. भारतातील अर्थव्यवस्थेत हे दुसरे सर्वात मोठे योगदान असेल.


इतका व्यवसाय आधीच झाला आहे


राम मंदिरामुळे एकाच वेळी अनेक पैलूंवर परिणाम होत आहे. मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यापासून रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी पाहायला मिळत आहे. अयोध्येतील आणि आसपासच्या जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. पर्यटकांच्या संभाव्य आगमनाच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी आतापासूनच तयारी जोरात सुरू केली आहे. यामुळे विशेषतः पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. राम मंदिरामुळे देशभरातील व्यापाऱ्यांना 1 लाख कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय झाला असल्याचं एका आकडेवारीतून समोर आलं आहे.


ही बातमी वाचा: