राज्यसभा निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार अत्यंत चाणाक्षपणे निवडून आणला आणि मविआला चांगलाच धक्का दिला. भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येणारच नाही याची खात्री महाविकासआघाडी (मविआ) नेत्यांना होती पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांची संख्या पाहून मतांचे गणित अत्यंत सोपे केलेले होते आणि त्याची चाहूलही त्यांनी मविआ नेत्यांना लागू दिली नव्हती. त्यामुळेच सहापैकी चार जागांवर मविआ जिंकून येईल याचा मविआ नेत्यांना पूर्ण विश्वास होता. भाजपने जेव्हा धनंजय महाडिक यांच्या रुपाने तिसरा उमेदवार दिला तेव्हा तडजोड करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मविआ नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उमेदवार मागे घेतल्यास विधान परिषदेला मदत करू असे आश्वासन मविआ नेत्यांनी फडणवीस यांना दिले होते. पण फडणवीस यांनी मविआनेच चौथा उमेदवार मागे घ्यावा असे मविआ नेत्यांना सांगितले होते. पण मविआ नेत्यांना जिंकण्याचा आत्मविश्वास असल्याने त्यांनी फडणवीसांची ऑफर ठोकरली आणि शेवटी पराभवही पत्करला.


आता आपले कुठे चुकले याचा अभ्यास मविआ नेत्यांनी सुरु केला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आघाडी सरकार असले तरी पराभव मात्र शिवसेनेचा झाला आहे. याचे कारण तिघांचे सरकार आले तेव्हा सरकारकडे एकूण 170 आमदारांचे संख्याबळ होते. तर भाजपकडे 114 आमदारांचे संख्याबळ होते. त्यानंतर पंढरपूरची पोटनिवडणूक जिंकल्याने भाजपचे संख्याबळ 115 वर पोहोचले होते. राज्यसभा निवडणुकीत मविआ आघाडीकडील संख्याबळ कमी झाले. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचे तुरुंगात असणे आणि शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन आणि पंढरपूर पोटनिवडणुकीत झालेला पराभव यामुळे मविआ समर्थकांची संख्या 166 वर आली. मात्र विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी तटस्थ राहिलेल्या एमआयएम आणि माकपने मविआला समर्थन देण्याचे घोषित केल्याने मविआचे संख्याबळ 169 वर पोहोचले होते. मात्र निवडणुकीचे निकाल पाहिले तर मविआच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची संख्या 161 आहे. शिवसेना आमदार महेश कांदे यांचे मत बाद ठरले नसते तर ही संख्या 162 वर गेली असती. म्हणजेच मविआची 8 मते फुटल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.


म्हणूनच भाजपच्या तिन्ही उमेदवारांना भाजपचे संख्याबळ 116 असताना त्यांना 123 मते मिळाली. म्हणजेच त्यांना थेट 7 मतांचा फायदा झाला. आणि याचे कारण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रणनीती. भाजप, मित्रपक्ष आणि अपक्षांच्या प्रत्येक आमदाराच्या मताचे गणित देवेंद्र फडणवीस यांनी तयार केले. पहिल्या पसंतीची मते कोणाला आणि कशी द्यायची याची आखणी त्यांनी केली आणि त्यानुसारच मतदान करवून घेतले. यासाठी भाजपच्या आजारी आमदारांनाही त्यांनी विधिमंडळात येण्यास प्रेरित केले आणि त्याचा फायदा त्यांना झाला. त्यामुळेच पियूष गोयल आणि डॉ. अनिल बोंडे यांना पहिल्या पसंतीची प्रत्येकी 48 मते मिळाली आणि धनंजय महाडिक यांना 27. पहिल्या पसंतीची सगळ्यात जास्त मते भाजप उमेदवारांना मिळाल्यानेच धनंजय महाडिक यांचा विजय सोपा झाला.


निकालानंतर मविआचे निर्माते शरद पवार यांनी भाजपचे एक मत फुटले आणि प्रफुल पटेल यांना मिळाले असे सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी माणसे त्यांच्या बाजूला वळवली असेही सांगितले. जर विरोधी पक्षात असून देवेंद्र फडणवीस अपक्षांना त्यांच्या बाजूने वळवू शकले तर सत्तेत असताना मविआ हे काम का करू शकले नाही असा प्रश्न यानिमित्ताने पडतो.


निवडणुकीपूर्वी मविआ नेते कोणत्या जगात वावरत होते ते समजले नाही. 170 चा जादुई आकडा घेऊनच ते रणनीती आखत होते. एवढेच नव्हे तर सर्व अपक्षही आपल्यालाच मत देतील असा विश्वासही त्यांना वाटत होता. तो का वाटत होता ते शेवटपर्यंत समजले नाही. या निवडणुकीत सगळ्यात जास्त नुकसान हे शिवसेनेचेच झाले. शिवसेनेच्या आमदारांची संख्या 55 असताना संजय राऊत यांना पहिल्या पसंतीची फक्त 41 मते मिळाली. याचाच अर्थ त्यांना पहिल्या पसंतीच्या मतांची योजना नीट आखता आली नाही. 14 मते संजय पवार यांना गेली असतील असे समजू. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या 53 असताना प्रफुल पटेल यांना 43 मते मिळाली. दुसरीकडे काँग्रेसचे संख्याबळ 44 आणि त्यांचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना पहिल्या पसंतीची सर्वच्या सर्व म्हणजे 44 मते मिळाली. संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मते मिळाली. यात काँग्रेसचे एकही मत नाही. तर 16 अपक्षांपैकी फक्त 9 मते संजय पवार यांना मिळाली असावीत असा अंदाज आहे.


160  पेक्षा जास्तीचे संख्याबळ असतानाही चौथा उमेदवार निवडून न आणणे हे मविआ नेत्यांचे अपयश आहे. मात्र आपले अपयश कबूल करण्यास मविआ नेते तयार नाहीत. अपक्ष किंवा छोट्या पक्षांच्या आमदारांना सोबत ठेवण्यातही मविआ नेते अपयशी ठरले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ज्या राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे तेथे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीने काँग्रेसने तिसरी जागा जिंकली पण महाराष्ट्रात मविआला चौथी जागा जिंकता आली नाही.


निकालानंतर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्वाचे वक्तव्य केले. राज्यसभेची निवडणूक गेमप्लॅनची होती. त्यात आघाडी नापास झाली आणि फडणवीस यांचा विजय झाला असे नाना पटोले यांनी म्हटले. मात्र निकालापूर्वी मविआला ही गोष्ट समजली असती तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. भाजपने आता आपले लक्ष 20 तारखेला होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीकडे वळवले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सर्वच्या सर्व म्हणजे सहा जागा जिंकू असे म्हटले आहे. खुले मतदान असतानाही भाजप जर राज्यसभेला तिसरा उमेदवार निवडून आणू शकतो तर गुप्त मतदान असलेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजप चमत्कार करून दाखवेल यात शंका नाही.


चंद्रकांत शिंदे यांचे इतर ब्लॉग :



BLOG : मोदींचा घराणेशाहीवर वारंवार हल्ला का?