Dhananjay Munde : शेतकरी बांधवांनी या खरीप हंगामात एक रुपयात पीक विमा (Pik Vima) भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी दिली. आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी तीन दिवसांची मुदत वाढ देण्यात आली असल्याचे मुंडे म्हणाले. उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज तीन ऑगस्टच्या आत ऑनलाइन भरुन घ्यावा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं. 


पीक विमा योजनेतून केवळ एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उभ्या पिकाचा विमा उतरवता येतो. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पार पडते. पण गेल्या अनेक दिवसांपासून पिक विमा उतरवताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. गेल्या काही दिवसांपासून पिक विमा भरण्यासाठी सरकारची वेबसाईट योग्यप्रकारे चालत नसल्यानं शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक जिल्ह्यातील शेतकरी सीएससी सेंटरवर पिक विमा अर्ज भरण्यासाठी चकरा मारत होते, पण ऑनलाईन फॉर्म भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तर काही जणांनी तर सीएससी सेंटरवरच थांबणं पसंत केलं होतं. 


राज्याची विनंती केंद्राकडून मान्य


पीक विमा भरण्यासाठीची वेबसाईट सतत हँग होत असल्याने शेतकऱ्यांना दिवस-दिवस सीएससी सेंटरवर बसून राहावं लागत होतं. अशातच पिक विमा भरण्यासाठी देण्यात आलेली शेवटची तारीख जवळ येत चालली होती. याच पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन पिक विमा भरण्यासाठी वेबसाईट सुरळीत करून पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. बळीराजाच्या याच मागणीचा विचार करुन राज्य सरकारनं तशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती. राज्याची हीच विनंती मान्य करत आता पिक विमा भरण्यासाठी केंद्राकडून 3 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. 


तीन ऑगस्टपर्यंत भरता येणार अर्ज 


राज्य शासनाच्या एक रुपया पीक विमा (Pik Vima) योजनेमध्ये आजपर्यंत दीड कोटी शेतकऱ्यांनी (Farmers) सहभाग नोंदवला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ही 31 जुलैपर्यंतची होती. मात्र, यामध्ये मुदतवाढ करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना तीन ऑगस्टपर्यंत पीक विम्यासाठी अर्ज भरता येणार आहे. याबाबतची माहिती खुद्द कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. सध्या राज्याच्या विविध भागात पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. ज्या भागात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे, त्याठिकाणी शेती कामांना वेग आला आहे. मात्र, अन्य काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Crop Insurance : पीक विम्याचा हप्ता भरण्यासाठी केंद्राकडून तीन दिवसांची मुदतवाढ; 3 ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण करता येणार