सिंधुदुर्ग : राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत राज्यभरातील मॉलमध्ये, विविध स्टॉलमध्ये वाईन विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या आधीच्या सरकारांनी जसा कोकणावर अन्याय केला तसाच याही सरकारने केला आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये द्राक्ष आणि इतर फळांवर प्रक्रिया करून वाईन तयार केली जाते. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून बोंडू वाया जात आहे. या बोंडूवर प्रक्रिया करून वाईन निर्मिती व्हावी, अशी मागणी कृषी विद्यापीठाने केली आहे. माझ्या आमदारकीच्या काळात मी देखील अशी मागणी केली होती. तत्कालीन एक्साईज मिनिस्टर गणेश नाईक यांनी अशी परवानगी देण्यास हरकत नाही, असे उत्तर दिले होते. मात्र त्यावर अजूनही काही निर्णय झाला नसल्याचे मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी म्हटलं आहे.

Continues below advertisement


परशुराम उपरकर यांनी म्हटलं आहे की, कोकणातील विविध फळांवर प्रक्रिया करून त्यापासून वाईन निर्मितीचे विविध फॉर्म्युले तयार झाले आहेत. यात जांभूळ, काजू, आंबा, करवंद यांपासून वाईन निर्मितीचे फॉर्म्युले तयार झाले आहेत. मात्र राज्य सरकारने या वायनरी निर्मितीला अद्यापही परवानगी दिली नाही. तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही परवानगी मिळण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. 


मात्र आम्ही मनसेच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि एक्साईज मिनिस्टर यांना निवेदन देऊन कोकणातील फळांपासून वाईन निर्मिती प्रकल्प सुरू केले जावेत. ज्यायोगे वाईन निर्मिती प्रकल्पातून लोकांनाही आर्थिक प्राप्ती होईल आणि रोजगार निर्मिती होऊन इथल्या लोकांची परिस्थिती सुधारेल. तसेच जिल्ह्यातील फळांना दर जास्त मिळून परकीय चलन मिळण्यासाठी पर्यटनासोबत याचाही उपयोग होईल, असे उपरकर यांनी म्हटले आहे.



हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha