Jalgaon Agriculture  : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुका हा केळी उत्पादनात केवळ देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. याच रावेर तालुक्यात मागील महिन्यांपासून लम्पी आजारानं थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. संकटात असणाऱ्या येथील शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. येथील केळी पिकावर सीएमव्ही नावाचा वायरस आलाय. त्यामुळे भागातील शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
 
जळगाव जिल्ह्यात 48 हजार हेक्टर क्षेत्रावर केळी पिकाची लागवड केली जाते. रावेर तालुका हा केळी उत्पादनात जगात अग्रेसर मनाला जातो. या ठिकाणच्या केळीला एक विशिष्ठ प्रकारची चव आहे. त्यामुळे या केळीला जगभर मागणी असते. मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन होत असल्याने या केळी पिकावर जळगावची अर्थ व्यवसथा अवलंबून असल्याचं मानलं जातं, केळीच्या शेतीसाठी बैलांचा वापर करावा लागत असल्याने आणि मोठ्या  प्रमाणात शेणखत लागत असल्याने या भागात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत. मात्र गेल्या महिना भर पासून या भागात जनावरांवर लम्पी आजार पसरल्याने अनेक जनावरांचा मृत्यू झाला. तसेच हजारो गुरे बाधित झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यातच आता या भागातील मुख्य पीक असलेल्या केळी पिकावर सीएमव्ही म्हणजेच कुकुंबर मोझॅक व्हायरसने हल्ला केल्याने हजारो हेक्टर वरील केळी पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असल्याचं पाहायला मिळत आहे. 


रावेर तालुक्यातील पातोंडी गावातील  शेतकरी शिवाजी पाटील यांनी आपल्या अकरा एकरवर केळी रोपांची लागवड केली होती. यातील दहा एकर केळीच्या रोपांवर सीएमव्ही व्हायरस आलाय. सीएमव्ही रोगामुळे शिवाजी पाटील यांना दहा एकरातील केळी पीक उपटून फेकले आहे. कारण एकदा का रोगाची बाधा झाली की ते झाडं अशक्त होते.  त्यात पाहिजे त्या प्रकारची निरोगी फळधारणा होत नाही.  त्यामुळे शेतकऱ्यांना ते झाडं उपटून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही. शिवाजी पाटील यांनी पिकावर आलेल्या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी तज्ञांच्या सल्ल्याने विविध प्रकारच्या फवारण्या केल्या. रोग पसरू नये म्हणून बाधित झालेल्या रोपांना प्लास्टीक पिशव्याने झाकून ठेवले. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी आपली संपूर्ण केळी बाग उपटून फेकली. यामध्ये त्यांना उत्पन्न येणे तर दूरच राहिले उलट स्वतच्या खिशातील सहा ते सात लाख रुपये खर्च झाले आहेत. अगोदरचा खर्च वाया गेला, आता पुढे काय लावयचं? त्याला पैसे कुठून आणायचे?  असा त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला आहे. या  रोगवर कोणताही विमा नसल्यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करून  किमान झालेला खर्च तरी  नुकसान भरपाई द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 


कृषी अधिकाऱ्यांच्या मते सीएमव्ही म्हणजेच कुकुंबर मोज्याक वायरस हा केवळ केळीवरच येतो असे नाही तर अन्य पिकांवर देखील येत असतो. मात्र सध्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लागवड करण्यात आलेल्या केळी रोपांवर याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याचा प्रसार मावा तुडतुडे आणि पांढरी माशी यामुळे होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्रकारची कीटकं आपल्या शेतात केळी रोपावर दिसून आली तर त्यावर तातडीने उपाय योजना केल्या पाहिजेत. त्याच एका झाडापासून इतर झाडांना त्याचा प्रसार होत असल्याने बाधित झाडे लक्षणे दिसताच क्षणी उपटून फेकली पाहिजेत. आपल्या शेतात सीएमव्हीची लागण झाली आहे,  का हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी रोपाच्या पानांचं निरीक्षण केले पाहिजे. झाड पिवळे पडून पानाच्या शिरा पांढरट दिसत असतील तर त्या रोपाला या रोगाची लागण झाल्याचं लक्षात घेतलं पाहिजे. अशा परिस्थितीत रोगाची लागण झालेली रोप उपटून फेकली तर निरोगी रोप वाचू शकतात, असे येथील कृषी अधिकारी मयूर भामरे यांनी सांगितलं.