Organic Jaggery In Hingoli : दरवर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (Sugarcane Farmers) एक ना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी वेळेवर ऊसाची तोडणी होत नाही, तर कधी वेळेवर एफआरपी (FRP) मिळत नाही. यासारख्या अनेक अडचणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर आहेत. परंतू यातून मार्ग काढत हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील देवजना येथील शेतकरी संतोष कल्याणकर (Santosh Kalyankar) यांनी सेंद्रिय गूळ उत्पादनातून (Organic Jaggery) चांगल उत्पन्न घेतलं आहे. काय आहे त्यांची यशोगाथा ते पाहुयात...


हिंगोली जिल्ह्यातील देवजना येथील शेतकरी संतोष कल्याणकर यांना घरी वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीपैकी अडीच एकर शेतात त्यांनी सेंद्रिय पध्दतीनं ऊसाचे उत्पादन घेतले आहे. या ऊसापासून शेतकरी संतोष कल्याणकर सेंद्रिय गूळ निर्मिती करतात. स्वतः च्या शेतातील ऊस तोडून शेतीच्याच बाजूला असलेल्या गूळ कारखान्यात गुळाचे गाळप केले जाते. अडीच एकर शेतात उत्पादन घेतलेल्या ऊसापासून 70 क्विंटल सेंद्रिय गूळ निर्मिती केली आहे. आता या गुळाला बाजारात मोठी मागणी आहे. या सेंद्रिय गूळ उत्पादनातून कल्याणकर यांना 4 लाख 50 हजाराचे उत्पन्न मिळाले आहे.




प्रति किलो गुळाला मिळतोय 60 ते 65 रुपयांचा दर


सेंद्रिय गुळाला बाजारात चांगला दर मिळत आहे. प्रतिकिलो गुळाला 60 ते 65 रुपयांचा दर मिळत आहे. 60 ते 65 रुपयाने गुळाची विक्री होत असल्यानं शेतकरी संतोष कल्याणकर यांना या सेंद्रिय गूळ उत्पादनातून 4 लाख 50 हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. तयार केलेला गूळ विक्री करण्यासाठी कोणत्याही बाजारपेठेत जायची गरज नाही. लोक घरी येऊन गुळाची खरेदी करत असल्याचे संतोष कल्याणकर यांनी सांगितलं. यामुळं ऊस तोडणीसाठी साखर कारखान्याकडे मागणी करायची गरज नाही, शिवाय यातून चांगला आर्थिक फायदा होताना दिसून येत असल्याचे कल्याणकर म्हणाले.


दरवर्षी चार ते साडेचार लाखाचे उत्पन्न


मी मागील सात वर्षापासून नैसर्गिक शेती करत आहे. मी नैसर्गिक शेतीचं एक शिबीर केलं होते. त्यानंतर मी नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अर्धा एकरवर ऊसाची लागवड केली होती. त्या ऊसात मी अंतरपीक केले होते. त्यामध्ये कांदा, हरभरा लावला होता. ऊसापासून उत्पन्न कमी मिळालं पण आंतरपिकापासून चांगले उत्पन्न मिळाल्याची माहिती संतोष कल्याणकर यांनी सांगितले. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांकडून गुळाला मागणी वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर ऊसाचं क्षेत्र मी वाढवले. सध्या अडीच एकर क्षेत्रावर नैसर्गिक ऊसाची लागवड केली आहे. हा ऊस बंधू दिपक कल्याणकर यांच्या गुळावर घालत असल्याचे संतोष कल्याणकर यांनी सांगितले. एका हेक्टरमध्ये 60 ते 70 क्विटंल गुळ निघतो. त्यापासून मला दरवर्षी चार ते साडेचार लाखाचे उत्पन्न मिळत असल्याचे कल्याणकर यांनी सांगितले. त्यामुळं लोकांनी नैसर्गिक शेतीकडे वळले पाहिजे असे कल्याणकर यांनी सांगितले. रासायनिक शेतीकडचा कल कमी करुन शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती करावी असं आवाहन कल्याणकर यांनी केलं.


महत्त्वाच्या बातम्या:


Milk Price : भारतात दुधाला सरासरी 50 रुपयांचा दर, तर पाकिस्तानसह नेपाळ आणि बांगलादेशमध्ये किती?  वाचा सविस्तर...