Pandharpur Agriculture News : यंदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची (Rain) नोंद झाली आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. अशातच परतीच्या पावसानं देखील राज्यातील काही भागात धुमाकूळ घातला आहे. या परतीच्या पावसानं पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील कासेगावमधील (Kasegaon) द्राक्ष (Grapes) बागांचं मोठं नुकसान झालं आहे. गेल्या दोन महिन्यापासून द्राक्षांच्या बागेतील पाणी हटलं नसल्यानं शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे.

  
यावर्षी राज्यात जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. यातून कशीबशी शेतकऱ्यांनी पिकं वाचवली होती. मात्र, परतीच्या पावसानं वाचवलेली पिकं वाया गेली आहेत. परतीच्या पावसानं गेल्या चार दिवसापासून धुमाकूळ घातला आहे. द्राक्षेचं हब अशी ओळख असलेल्या कासेगाव परिसरातील द्राक्ष बाग उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कासेगाव परिसरात या परतीच्या पावसामुळं मोठं नुकसान झालं असून जवळपास सात हजार एकरावरील द्राक्ष बागा अडचणीत सापडल्या आहेत.




द्राक्ष बागांवर दवण्या रोगाचा प्रादुर्भाव


या परतीच्या पावसानं गेल्या कित्येक दिवसापासून शेतातील पाणी मोटरने काढूनही निघत नसून रोज पडणाऱ्या जोरदार पावसानं पिके मातीमोल होऊ लागली आहेत. ऊस, धान्य पिकं, डाळिंब, द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्याने पिकं धोक्यात आली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. नवीन बाग उभारायला एकरी पाच लाख रुपयांचा खर्च येतो. कर्ज घेऊन या भागात द्राक्ष बागा उभारल्या आहेत. यंदाही बागा जतन करण्यासाठी एकरी दोन लाखांच्या आसपास खर्च झाला आहे. मात्र, अति पावसामुळं बागेत सर्वत्र पाणीच साचून राहत असून झाडांवर दवण्या सारखे रोग आल्यानं 50 टक्के उत्पन्न तरी मिळणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिला आहे.




लवकरात लवकर पंचनाने करुन मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी


या परतीच्या पावसानं बागांची पाने गळून पडत असल्यानं पुन्हा या बागा जोपासण्यासाठी लाखो रुपये फवारण्यांवर खर्च करावा लागणार आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. निसर्ग वारंवार बळीराजावर कोपत आहे. तर दुसरीकडं राजकारण्यांना त्यांच्या कुरघोडीच्या राजकारणातून शेतकऱ्यांकडे बघायला वेळच नसल्याची खंत कासेगाव येथील शेतकरी रामचंद्र यादव यांनी व्यक्त केली. यादव यांनी 25 लाखांचे कर्ज काढून पाच एकर द्राक्षाची बाग उभी केली आहे. यावर्षी या पाच एकरवर जवळपास 10 लाख रुपये खर्च केले होते. मात्र, या परतीच्या पावसानं पुन्हा एकदा यादव कर्जाच्या चक्रात अडकणार आहेत. कासेगाव परिसरात किमान दरवर्षी दोन हजार कोटीचे उत्पन्न  द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मिळत असते. मात्र, या परतीच्या पावसानं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारनं लवकरात लवकर पंचनाने करुन शेतकऱ्यांना मदत करावी अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Nanded Rain : नांदेड जिल्ह्याला परतीच्या पावसाचा तडाखा, कापसाच्या झाल्या वाती तर सोयाबीनला फुटले कोंब