Crop Production : आहारातील एक तृतीयांश भाग हा पिकांच्या परागीभवनाद्वारे मिळत असतो. मधमाशांमुळे (Bees) होणाऱ्या परागीभवनाद्वारे पीक उत्पादनात (Crop Production) 5 ते 40 टक्क्यांची वाढ होते. त्यामुळे मधमाशांबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचे मत राहुरी कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सी. एस. पाटील (Dr. C. S. Patil) यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित मध महोत्सवातील ‘शेती व मधमाशापालन या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. 


कीडनाशकांचा अतिरेकी वापर मधमाशांसाठी घातक


आहारातील एक तृतीयांश भाग परागीभवनाद्वारे मिळतो. परागीभवनाची प्रक्रिया होण्यासाठी राज्यात नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती पूरक आहे. मधमाशांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळे 5 ते 40 टक्क्यांपर्यंत पीक उत्पादनात वाढ झाली आहे. उत्पादनांची गुणवत्ता राखून उत्पन्न अधिक पौष्टिक होते, असेही संशोधनात पुढे आले आहे. कीडनाशकांचा अतिरेकी वापर मधमाशांसाठी घातक ठरत आहे. पण त्याशिवाय मधामध्ये कीडनाशकांचा अंश आढळून येत आहे, हे जास्त धोकादायक आहे. किडनाशक मंडळाने 329 किडनाशके प्रमाणित केली आहेत. तीच शेतकऱ्यांनी वापरावीत. कीडनाशकांमुळे मधमाशा नष्ट होत आहेत. त्यांना वाचवायचे असेल, तर कीडनाशकांचा कमी वापर करून सेंद्रिय शेतीकडे वळावे असेही पाटील यावेळी म्हणाले.


कोणत्या पिकात किती होते वाढ?


विविध फळे, भाज्या, धान्य, तेलबिया आणि इतर पिकांमध्ये परागीभवनाची प्रक्रिया होते. निसर्गाचा जैविक समतोल साधण्याची किमया परागीभवनात असते. यात सर्वात जास्त हातभार हा मधमाशांचा लागतो. तसेच पिकांना कीटकांपासून वाचविण्यातही मदत होत असते. मधमाशांमुळे परागीभवन झाल्यामुळे पीक उत्पादनात वाढ होणारी  विविध पिके आहेत. तेलवर्गीय मोहरीत 43 टक्के, सूर्यफुलात 32 ते 48 टक्के, करडईत 28 टक्के, तीळ 22 ते 37, सोयाबीन 19 टक्के, एरंडी 30, जवस 17 ते 40, नायगर 22 टक्के उत्पादन वाढ झाल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. 


मध हे सर्वात पौष्टिक अन्न, मध्यामध्ये औषधी गुणधर्म


मधमाशांमुळं मिळणारे मध हे सर्वात पौष्टिक अन्न मानले जाते. डोळ्यासाठी हितकारक, स्वरामध्ये सुधारणा, बुद्धीधारणक्षमता वाढविणारा म्हणून मधाची ओळख आहे. खोकला, पित्त, कफ, क्षय, कर्करोग, मधुमेह, ह्दयरोग, मळमळ यावर मध गुणकारी आहे. तसेच भूक वाढवण्यासाठीही तो उपयुक्त आहे. मधमाशांच्या संवर्धनासाठी आपण फुले देणाऱ्या झाडांची लागवड करण्याबरोबरच सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले पाहिजे. मधमाशांना आकर्षित करणाऱ्या पिकांची लागवड करून शेतात किमान एक तरी मधमाशी वसाहत असावी अशी व्यवस्था केली पाहिजे. कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशकांचा कमीत कमी वापर केला पाहिजे. शेतात असलेल्या मधमाशींच्या पोळ्याचे संगोपन केले पाहिजे. तसेच प्रतिकूल हवामान असल्यास मधमाशी पेट्यांची काळजी घेण्याची गरज आहे.


मध काढण्याची शास्त्रीय पद्धत अवलंबवावी


मधमाशी अर्धा ते एक किलोमीटर भागात फिरून एक पोळी तयार करते. फुलोरी मधमाशी ही परागीभवणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मधमाशीचे एक पोळे नष्ट करणे म्हणजे त्या शेत शिवारातील उभे पिक नष्ट करण्यासारखे आहे. तसेच आग्या पोळ्यामध्ये पन्नास हजार ते एक लाख मधमाशा असतात. जाळ करून किंवा धूर करून माशा उडवल्या आणि मध काढला तर जवळपास 25 एकर मधील जंगल नष्ट होते. त्यामुळे मध काढण्याची शास्त्रीय पद्धत अवलंबवावी. मधाच्या पोळ्यामध्ये मध असलेला भाग फुगीर होतो. तेवढा भाग वेगळा काढून आपण मधमाशीचे पोळे वाचवू शकतो. पुन्हा ते पोळे पूर्ववत लावल्यास बाहेर गेलेल्या माशा त्यावर परत येतात, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. 


मधमाशांच्या मुख्य जाती कोणत्या?


आग्या माशी आणि फुलोरी माशी या दोन माशांच्या जाती जंगली मधमाशा आहेत. तर सातेरी, मेलीफेरा आणि ट्रायगोना कोती या पेटीत पाळता येणाऱ्या मधमाशा आहेत. फुलोरी मधमाशी पेटीत घेण्याचे मुख्य कारण म्हणजे ही स्थानिक मधमाशी आहे. ती स्थानिक हवामानाशी जुळलेली असते. स्थानिक पिकांच्या फुलांवर खूप मोठ्या प्रमाणात तिचा आढळ आहे तसेच तिचा परागीभवनाच्या प्रक्रियेत मोठा वाटा आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Red Honey: दारुपेक्षा जास्त नशा 'या' लाल मधात! जगभरातून मोठी मागणी; कुठे मिळतं हे मध?