Sharad Pawar :  सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीतील (organic farming) प्रश्न राज्य व केंद्र सरकारपुढे मांडणार असून, त्याची सोडवणूक होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांनी व्यक्त केलं. शेती क्षेत्रात बदल होत आहेत, त्या बदलाची नोंद घेऊन आपण पावले टाकली पाहिजेत असेही पवार म्हणाले. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मंगळवेढा इथं महाऑरगॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अर्थात मोर्फा आणि आम्रपाली ॲग्रो टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सेंद्रिय शेती कार्यशाळेत पवार बोलत होते. यावेळी काँग्रस नेते सुशिलकुमार शिंदे. मार्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 




सेंद्रिय व विषमुक्त मालाचे उत्पादन वाढवणं गरजेचं


सेंद्रिय व विषमुक्त शेतीमध्ये उत्पादनाबरोबर मार्केटिंगचा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे शरद पवार म्हणाले. त्यासाठी त्याची विश्वासार्हता अत्यंत महत्वपूर्ण आहे. शेती क्षेत्रात बदल होत आहेत, त्या बदलाची नोंद घेऊन आपण पावले टाकली पाहिजेत असेही पवार म्हणाले. मोर्फा संघटना राज्यात विषमुक्त व सेंद्रिय शेतीतील प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणत आहे. सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासनाच्या धोरणात बदल करण्यासाठी आपण संबंधित मंत्र्यांबरोबर येणाऱ्या निवडणुकांचा कालावधी संपल्यानंतर  बैठका घेऊ असे पवार म्हणाले. सेंद्रिय व विषमुक्त मालाचे उत्पादन वाढवणे आणि मार्केटिंगसाठी मदत करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी शरद पवार यांनी दिले.




सेंद्रिय शेतीचे धोरण बनवण्यामध्ये पवार साहेबांचा महत्त्वाचा वाटा : अंकुश पडवळे


मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे बोलताना  म्हणाले की, सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकरी अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत आहेत पण मार्केटिंगमध्ये शासनाच्या मदतीची  अत्यंत गरज आहे. खासदार शरद पवार यांनी राज्य व केंद्र सरकार बरोबर सेंद्रिय शेतीच्या प्रश्नाबाबत अनेक बैठका घेऊन राज्याचे सेंद्रिय शेतीचे धोरण बनवण्यामध्ये पवार साहेबांचा महत्त्वाचा वाटा आहे. यापुढं आपणाला नैसर्गिक शेतीपेक्षा शाश्वत सेंद्रिय शेतीची गरज असून त्या दृष्टीने मोर्फा संघटना राज्यामध्ये पावले टाकत असल्याचेही पडवळे यांनी सांगितले.


विषमुक्त व अँटिबायोटिक दुध उत्पादन काळाची गरज


सेंद्रिय शेतीबरोबर शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाला अतिशय महत्त्व आहे. विषमुक्त व अँटिबायोटिक दुध उत्पादन काळाची गरज असून अशा दुधाला योग्य किंमत मिळण्यासाठी शासन व खासदार शरद पवार यांच्याकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे. दूध उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाला व ए टू मिल्क दुधाला चांगली बाजारपेठ मिळाल्यास सेंद्रिय शेती करणारा शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल असेही पडवळे म्हणाले. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,  काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, आम्रपाली अॅग्रो टुरिझमच्या संचालिका सुदर्शना आनंद लोकरे, मोर्फाचे संचालक हरिभाऊ यादव,  पाणी संघर्ष समितीचे ॲड भारत पवार, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, रणजीत जगताप, संजय कट्टे, मोर्फाचे जिल्हाध्यक्ष संजय दिघे आधी उपस्थित होते.


महत्त्वाच्या बातम्या:


तरुण शेतकऱ्याचा 'सेंद्रिय गुळाचा' यशस्वी प्रयोग, वर्षाला कमावतोय 8 ते 9 लाख रुपये