Banana News : नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळीचे (Banana) उत्पादन घेतलं जातं. मात्र, केळी पिकाला पाहिजे तसा दर मिळत नाही. त्यामुळं जिल्ह्यातील  केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. केळीला हमीभाव मिळावा म्हणून राष्ट्रवादीचा पाठपुरावा सुरु असल्याची माहिती नंदूरबार जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी दिला आहे. जिल्ह्यात केळी खरेदीवर बाजार समितीचे नियंत्रण नसल्यानं व्यापारी मनमानी कारभार करत असतात. शेतकऱ्यांना दर देताना मोठ्या प्रमाणात मनमानी सुरु असल्याने खासगी व्यापाऱ्यांना चाप बसण्यासाठी केळीला शासनानं हमीभाव जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र उभं करावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. 


उत्तर महाराष्ट्रात 45 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. त्यापैकी 15 हेक्टर क्षेत्र एकट्या नंदूरबार जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जाते. जिल्ह्यातील नंदूरबार, शहादा, तळोदा,अक्कलकुवा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळीच क्षेत्र आहे. मात्र, जिल्ह्यात केळी खरेदीवर बाजार समितीचे नियंत्रण नसल्यानं व्यापारी मनमानी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.


केळीचा उत्पादन खर्च मोठा


केळी पिकाला पाहिजे तसा हमीभाव मिळत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी केळीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. केळीच्या पिकांसाठी मोठा खर्च करावा लागत आहे. केळीसाठी महागडी खत, निंदणी, ठिंबक, सिंचन ,मल्चिंग पेपर अशा अनेक साहित्य केळी पिकांसाठी लागत आहेत. सध्या मजुरांची मजुरी देखील वाढली आहे. व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकरणात देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं शेतकरी दुहेरी  संकटात सापडला आहे. नंदूरबार जिल्ह्यात केळी खरेदी विक्री बाजार समितीच्या नियंत्रणात आणावी, तसेच शासनाने हमी भाव जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.


सरकारनं हमीभाव जाहीर केला नसल्यामुळं शेतकऱ्यांची लूट होण्याची शक्यता 


महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यानंतर नंदूरबार जिल्ह्यात केळीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जाते. यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. केळीचं उत्पादनही चांगले आलं आहे. मात्र, सरकारनं हमीभाव जाहीर केला नसल्यामुळं शेतकऱ्यांची लूट होण्याची शक्यता असल्याचे मत नंदूरबार जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी व्यक्त केले.  जे खासगी व्यापारी आहेत, ते कमी दरात केळीची खरेदी करतात, अनेक तोता व्यापारी देखील जिल्ह्यात येत असतात. मागील वर्षी देखील काही ठिकाणी अशा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून ट्रकच्या ट्रक माल खरेदी करुन शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत. त्यामुळं सरकारनं तातडीनं केळीला हमीभाव जाहीर करावा अशी मागणी मोरे यांनी केली आहे. केळी पिकाला पाहिजे तसा हमीभाव मिळत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी केळीसाठी केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. केळीच्या पिकांसाठी मोठा खर्च करावा लागत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Banana Farming : केळीला उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव मिळावा, केळी उत्पादक शेतकरी संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी