Nashik Bus Accident : महाराष्ट्रातील नाशिक येथे मोठी दुर्घटना घडली आहे. खासगी बसला (Bus Fire) भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला आहे. अपघातात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक जवळ नांदूर नाका येथे बसला आग लागून हा मोठा अपघात झाला आहे.


अपघातात होरपळून 12 जणांचा जागीच मृत्यू


यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसचा नाशिक येथे अपघात झाला. या बसला आग लागली. ही बस स्लीपर कोच होती. दरम्यान या आगीत 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. 38 जण जखमी झाले असनू जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेबाबत शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.






12 जणांचा मृत्यू, 38 प्रवासी जखमी



 


चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागून हा भीषण अपघात झाला आहे. धुळ्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेलरची बसला धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. ट्रेलरची बसला धडक बसली, यामुळे बसने पेट घेतला. यामध्ये 12 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाकडून अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती ट्रॅव्हल्स कंपनीचे मालक गुड्डू यांनी दिली आहे. 


अपघातग्रस्त बसमधील बचावलेल्या प्रवाशाची प्रतिक्रिया : येथे पाहा 






बसला ट्रेलरची धडक झाल्यानं अपघात


आमचे प्रतिनिधी गोळुळ पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल मिरची चौकात आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात खासगी प्रवाशी बस जळून खाक झाली. ही आग एवढी भीषण होती की 12 जणांचा मृत्यू झाला. पहाटे 04 वाजून 20 मिनिटांनी हा अपघात झाला. 


नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर ही भीषण घटना घडली आहे. मिरची हॉटेल परिसरात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने बसमधील प्रवासी होरपळले. आग एवढी भीषण होती की काही वेळात आगीत झालेल्या स्फोटाने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. त्यानंतर घटनेची माहिती शहरात पसरली. चिंतामणी ट्रॅव्हलची ही यवतमाळ येथून मुंबईकडे निघालेली बस होती. दरम्यान नाशिकमधून ही बस मुंबईकडे मार्गस्थ झाली असतांना पहाटे साडे चार ते पाच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.