Agriculture News : यंदाचा ऊसाचा गळीत हंगाम कधी सुरु होणार याची चर्चा सुरु आहे. यावर्षी अपेक्षीत पाऊस न झाल्यानं चालू ऑक्टोबर महिन्यात साखर कारखाने सुरु होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळं 1 नोव्हेंबर 2023 पासून यावर्षीचा ऊसाचा गळीत हंगाम सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री समितीची बैठक होणार आहे. यामध्ये ऊसाचा गळीत हंगाम कधी सुरु होणार याबाबतचा निर्णय होणार आहे.


मंत्री समितीच्या बैठकीत ऊसाची थकीत बिले, राज्यातील ऊसाची एकूण उपलब्धता याचा आढावा घेण्यात येईल. याच बैठकीत गाळप हंगामाची तारीख निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, राज्य सरकार 1 नोव्हेंबर 2023 पासून गाळप हंगाम सुरु करण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे.


साखर कारखाने सुरु करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह


राज्यात साखर हंगाम सुरु करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. ऊसाचे घटलेले उत्पादन आणि चाऱ्यासाठी होत असलेला वापर बघता गाळप हंगाम 15 ऑक्टोबरला सुरु करण्याची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे लवकर हंगाम सुरु केल्यास उसाला योग्य उतारा मिळणार नाही आणि त्यातून शेतकरी आणि कारखान्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्यानं हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरु करावा, अशी मागणी होतेय. 


कमी पावसाचा ऊसाच्या उत्पादनावर परिणाम


यावर्षी राज्यात पावसाचं प्रमाण कमी राहिलं आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. याचा परिणाम ऊसाच्या उत्पादनावर होणार आहे. त्यामुळं मागील हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पावसाअभावी ऊसाचे घटलेले क्षेत्र, विविध साखर कारखान्यांनी वाढवलेली क्षमता यामुळं यावर्षी ऊस गाळप हंगाम कसाबसा केवळ तीन महिने चालण्याची शक्यता आहे. देशातील साखर उत्पादनापैकी सुमारे एक तृतीयांश साखर उत्पादन महाराष्ट्रात होते.


राज्यात 94 लाख टन साखरेचं उत्पन्न होण्याची शक्यता


साखर आयुक्तालयाच्या अंदाजानुसार यंदा 970 लाख टन ऊसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. यातील 15 लाख टन साखर इथेनॉल तयार करण्याकडे वळवली जाईल. त्यामुळं यंदा राज्यात 94 लाख टन साखरेचं उत्पन्न होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर ते जानेवारी हे तीन महिने ऊसाचा गळीत हंगाम चालणार आहे. यंदा उत्पादनात 15 ते 18 टक्के घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुऱ्हाळघरे आणि खांडसरी सुरू झाल्या आहेत. अनेक शेतकरी आपला ऊस गुऱ्हाळघरे आणि खांडसरीला पाठवत आहेत. जर राज्यातील गाळप हंगाम उशिरा सुरु झाला तर काही शेतकरी तोपर्यंत गाळपासाठी अन्य पर्याय स्वीकारू शकतात. त्याचा फटका साखर कारखान्यांना बसू शकतो.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : ऊसावरुन होणाऱ्या संघर्षाची सरकारला धास्ती, अखेर 'तो' निर्णय मागे; स्वाभिमानी म्हणते श्रेय आमचं