एकीकडे दसऱ्याची धामधूम सुरु असताना, तिकडे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे,आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं.

निलेश राणेंच्या ट्विटनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निलेश राणेंनी हा निर्णय का घेतला याचे कारण अस्पष्ट आहे.

निलेश राणे म्हणाले, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.

मागच्या 19-20 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे.

भारतीय जनता पक्षामध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.

मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले.

निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही.

टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही.

कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.