'माझी वसुंधरा'अभियानांतर्गत एकाच दिवसात 20 हजार झाडांचं वृक्षारोपण,सोलापूर महानगरपालिकेचा उपक्रम
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील 'माझी वसुंधरा' या अभियानाअंतर्गत एकाच दिवसात तब्बल 20 हजार झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं आहे. सोलापुरातील केगांव- देगांव रोड येथे पालिकेच्या मोकळ्या 43 एकर जागेवर नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या भांडवली निधीतुन वृक्षारोपणाचा कार्यक्रम पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत पार पडला. विशेष म्हणजे वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी या परिसरात असलेल्या विहिरीतून संपूर्ण परिसरात ठिबक सिंचन करण्यात आले आहे. तसेच परिसराची विभागणी करून त्याच्या देखभालीची जबाबदारी शहरातील एक एक उद्योजक घेणार आहे. त्यामुळे या परिसरात ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याचा प्रयत्न पालिकेच्या वतीने केला जात आहे. या परिसरात पर्यटक यावेत म्हणून ग्रीन पार्क, रॉक गार्डन, नॅचरोपॅथी केंद्र येत्या काळात सोलापूरकरांसाठी उभं करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त तथा माझी वसुंधरा अभियानाचे नियंत्रक धनराज पांडे यांनी दिली.

















