2006 साली बॉम्बस्फोटात पाय गमावले, पण जिद्द सोडली नाही, चिराग चौहान आज तीन कंपन्यांचा मालक
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 13 Jul 2021 07:04 PM (IST)

चिराग चौहान हा 2006 ला इतर सर्व तरुण प्रमाणेच डोळ्यात भविष्याची स्वप्न घेऊन हा तरुण कष्ट करत होता. त्याला सीए बनायचे होते. त्यासाठी मन लावून अभ्यास सुरू होता. अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून एका कंपनीत तो शिकायला जात होता. पण नियतीच्या मनात वेगळाच खेळ होता. 11 जुलै 2006 ला चिराग घरी येत असताना त्याच्या लोकलच्या डब्यात बॉम्ब स्फोट झाला. ज्यावेळी त्याचे डोळे उघडले त्यावेळी त्याच्यावर सर्वात मोठा आघात झाला कारण यापुढे आयुष्यात तो कधीही स्वताच्या पायावर चालू शकणार नव्हता. बॉम्बस्फोटात त्याच्या मणक्यात लोकलचा डब्याचा पत्रा घुसला होता त्यामुळे त्याच्या मज्जा रज्जू ला दुखापत होऊन पाठी पासून खालचा भाग पूर्णतः अधू झाला. पण म्हणून चिराग ने आयुष्य थांबवलं नाही.