मुंबई : मुंबई महानगरपालिका आयपीएलसाठी पाणी पुरवठा करत नाही, केवळ मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या देखरेखीसाठीचं पाणी पालिकेतर्फे पुरवलं जातं, असा दावा बीएमसीच्यावतीने मुंबई हायकोर्टात करण्यात आला. यावर महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले.

आयपीएल सामान्यांसाठी जवळपास 40 लाख लिटर पाणी लागतं. दोन वर्षांपूर्वी राज्यात दुष्काळ असताना क्रिकेटच्या सामन्यांसाठी पाणी देऊ नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका लोकसत्ता मुव्हमेंट या सामाजिक संघटनेने केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळची दुष्काळाची गंभीर स्थिती पाहता अशा प्रकारे पाण्याची उधळपट्टी थांबवायला हवी जेणेकरून भविष्यात पुन्हा असं संकट आल्यास पाण्याची वानवा होणार नाही, असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.

पिण्यास योग्य असलेलं पाणी खेळपट्टीसाठी कधीही वापरलं नसल्याचा दावा एमसीएच्यावतीने याआधीच हायकोर्टात करण्यात आला आहे.