मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंड दौऱ्यातील अखेरच्या दोन वनडे आणि तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. यावेळी भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ अजूनही चार वन डे आणि तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये खेळणार आहे. त्यापैकी दोन वन डे आणि तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. पण विराट कोहलीच्या अनुपस्थितीत या सामन्यांसाठी पर्यायी खेळाडूचा भारतीय संघात समावेश करण्यात येणार नसल्याचे बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.

बीसीसीआयच्या मते 24 फेब्रुवारीपासून भारतात सुरु होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी विराट फिट असणे आवश्यक आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा 2018 पासून क्रिकेट मालिकांमध्ये खेळतो आहे. आशिया चषक स्पर्धा वगळता विराटला एकाही सामन्यांमध्ये विश्रांती मिळलेली नाही. त्यामुळे विराटला काही सामन्यांसाठी विश्रांती देण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

याआधी विराट कोहलीच्या टीम इंडियाने नेपियरच्या पहिल्या वन डेत न्यूझीलंडचा आठ विकेट्स आणि 85 चेंडू राखून धुव्वा उडवत ऑस्ट्रेलिया दौऱ्यातला विजयी सिलसिला न्यूझीलंड दौऱ्यातही कायम ठेवला आहे. भारतीय संघाने नेपियरच्या पहिल्या वन डेत न्यूझीलंडचा आठ विकेट्स आणि 85 चेंडू राखून धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियाने पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.