नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंहची निवड न झाल्यामुळे चर्चेला ऊत आला. मात्र युवराजला वगळलं नाही, तर त्याला विश्रांती देण्यात आली असल्याची माहिती निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी दिली आहे.


फिटनेसमुळे युवराजला विश्रांती देण्यात आली. बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये युवराज पात्र ठरु शकला नाही. बीसीसीआयच्या या यो-यो टेस्टमध्ये पात्र ठरण्यासाठी कमीत कमी 19.5 गुणांची आवश्यकता असते, मात्र युवराजला केवळ 16 गुण मिळाले.

बीसीसीआयच्या या टेस्टसाठी जे खेळाडू भारतात उपलब्ध नव्हते, त्यांच्यासाठी श्रीलंकेतील कॅण्डीमध्ये यो-यो टेस्टचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक दिवसांपासून संघातून बाहेर असलेला सुरेश रैनाही या टेस्टमध्ये पात्र ठरु शकला नाही.

युवराज आणि रैना यांच्यासोबतच टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि मनिष पांडेने ही टेस्ट दिली. 19.2 गुणांसह मनिष पांडे संघातील तंदुरुस्त खेळाडू ठरला. तर कर्णधार विराट कोहलीला सर्वाधिक 21 गुण मिळाले आहेत.

धोनीच्या कामगिरीवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असलं तरी त्याचा फिटनेस आजही कायम आहे. कारण सर्वात तंदुरुस्त खेळाडूंच्या यादीत धोनी तिसऱ्या स्थानावर आहे. धोनीने या बाबतीत अनेक युवा खेळाडूंनाही मागे सोडलं.

इंग्लंडमध्ये होणाऱ्या 2019 च्या विश्वचषकासाठी भारतीय संघाचं स्वरुप येत्या पाच महिन्यात स्पष्ट होईल, असं निवड समितीचं म्हणणं आहे. तर संघात स्थान देताना खेळाडूंचा फिटनेस हा महत्त्वाचा मुद्दा असेल, असं मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पदभार स्वीकारतानाच स्पष्ट केलं होतं.