नवी दिल्ली : सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये दरोडेखोरांनी अनेक प्रवाशांकडील लाखोंचा ऐवज लुटल्याची घटना घडली. मुंबईहून दिल्लीला जात असलेल्या राजधानी एक्स्प्रेसमधील सात डब्यातील 20 प्रवाशांकडील रक्कम आणि मौल्यवान वस्तूंवर दरोडेखोरांनी डल्ला मारला.


कोच नंबर 3, 5, 6, 7, 10, 11 आणि A-1  मध्ये रतमल ते कोटा या दरम्यान मध्यरात्री ही घटना घडली. प्रवाशांना त्यांच्या बॅग पँट्री कार आणि बाथरुममध्ये आढळून आल्या. ट्रेन दिल्लीला पोहोचल्यानंतर हजरत निजामुद्दीन स्टेशनवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान दोन दिवसांपूर्वीही अशीच घटना घडली होती, मात्र हे प्रकरण दाबण्यात आलं, असा आरोपही काही प्रवाशांनी केला आहे. ट्रेनमध्ये सुरक्षारक्षक आणि टीटीई कमी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मात्र या प्रकरणामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.