T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकातील काल झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात (India Vs Pakistan) पाकिस्तानने भारताला पराभूत करून ऐतिहासिक कामगिरी केली. विश्वचषकात भारताविरुद्ध विजय मिळवून पाकिस्तानने गेल्या अनेक वर्षांचा विक्रम मोडीत काढला. याआधी पाकिस्तानच्या संघाला विश्वचषकात भारताविरुद्ध एकही सामना जिंकता आला नाही. मात्र, बाबर आझमच्या नेतृत्वात काल पाकिस्तानने भारताचा 10 विकेट्सने दारूण पराभव केला. या सामन्याचा हिरो ठरलेल्या मोहम्मद रिझवानचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. 



 शोएब अख्तरनं सोशल मीडियावर रिझवानचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, अल्लाह त्या मस्तकाला कुणापुढं झुकु देत नाही जो त्याच्यासमोर झुकतो. रिझवानचा हा व्हिडीओ ब्रेकमधील असल्याचं दिसतं. या व्हिडीओत अन्य खेळाडू ड्रिंक्स घेत असल्याचं दिसत आहे. 


IND Vs PAK: हाय व्होल्टेज सामन्यात भारताचा दारूण पराभव, विश्वचषकातील परंपरा कायम राखण्यात विराटसेना अपयशी


कालच्या या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला 20 षटकात 7 विकेट्स गमावून 151 धावा केल्या. भारताने दिलेले लक्ष्य पाकिस्तानच्या सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी करीत संघाला 17व्या षटकात विजय मिळवून दिला. 


नाणेफेक गमावल्यानंतर भारताकडून सलामी देण्यासाठी मैदानात आलेले रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना चांगली कामगिरी करता आली नाही. रोहित शर्माने शून्यावर त्याची विकेट्स गमावली. तर, केएल राहुल 8 चेंडूत केवळ 3 धावा करून माघारी परतला. यांच्यापाठोपाठ सुर्यकुमार यादवही 11 धावा करून आऊट झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने ऋषभ पंतला सोबत घेत किल्ला लढवला. विराटने जबरदस्त अर्धशतकी खेळी करत पंतसोबत अर्धशतकी भागीदारी केली. आफ्रिदीने भारताच्या रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना स्वस्तात तर डावाच्या शेवटी विराट कोहलीला तंबूत धाडले. विराट कोहलीने 49 चेंडूत सर्वाधिक 57 धावा केल्या. दरम्यान, भारताला 20 षटकात 151 धावापर्यंत मजल मारता आली.
 
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझमने आक्रमक खेळी केली. ज्यामुळे पाकिस्तानच्या संघाला भारतावर 10 विकेट्सने विजय मिळवता आला आहे. दरम्यान, मोहम्मद रिझवानने 55 चेंडूत 79 तर, बाबर आझमने 52 चेंडूत 68 धावा केल्या.