रिओ दी जेनेरिओ: रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं पदकाचं खातं अखेर उघडलं आहे. भारताची पैलवान साक्षी मलिकनं महिलांच्या 58 किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाईल कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली. कांस्यपदकाच्या लढतीत साक्षीनं किर्गिस्तानच्या आयसुलू तायनाबेकोव्हवर 8-5 अशी मात केली.


 

या सामन्यात साक्षी मलिक पहिल्या फेरीत पाच गुणांनी पिछाडीवर होती. पण दुसऱ्या फेरीत साक्षीनं जबरदस्त कमबॅक करुन 5-5 अशी बरोबरी साधली. मग सामन्याच्या अखेरच्या दहा सेकंदात साक्षीनं तीन गुणांची कमाई करुन 8-5 अशी आघाडी घेतली आणि भारताला कांस्यपदक जिंकून दिलं.

 

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी साक्षी मलिक ही पहिलीच भारतीय महिला पैलवान ठरली आहे. तर कुस्तीतल भारताचं हे आजवरचं पाचवं पदक ठरलं. याआधी खाशाबा जाधव यांनी 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल होतं. तर सुशीलकुमारनं 2008 साली बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती. 2012 सालीच योगेश्वर दत्तनंही कांस्यपदक पटाकवलं होतं.

 

ऑलिम्पिक पदक जिंकणारी साक्षी मलिक ही आजवरची केवळ चौथीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याआधी कर्णम मल्लेश्वरीनं 2000 साली सिडनीत झालेल्या स्पर्धेत वेटलिफ्टिंगचं कांस्यपदक जिंकलं होतं. तर बॉक्सर मेरी कोम आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल या दोघींनही 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती.

 

साक्षीनं कांस्यपदक जिंकल्यानंतर रोहतकमध्ये तिच्या राहत्या एकच जल्लोष करण्यात आला. साक्षीच्या आई-वडीलांसह तिच्या कुटुंबीयांनी यावेळी पेढे वाटून आपला आनंद साजरा केला. साक्षीची ही कामगिरी पाहून तिच्या आईला आपले अश्रू अनावर झाले होते.