Mirabai Chanu Wins Medal: टोकियो इथं सुरु असलेल्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं आहे. मीराबाई चानूनं दिलं भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात तिनं रौप्यपदक मिळवलं आहे. मीराबाई चानूनं पदक जिंकल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पदक मिळाल्यानं खूप आनंदी आहे. माझ्या देशासाठी पदक जिंकल्याचा जास्त आनंद आहे. संपूर्ण देशवासियांच्या माझ्याकडून अपेक्षा होत्या. त्या पूर्ण करण्याचा निर्धार केला होता. काहीशी दडपणाखाली होते मात्र सर्वोत्तम कामगिरी करण्याचा निर्धार मी केला होता. त्यासाठी खूप कष्टही घेतले, असं मीराबाई चानूनं म्हटलं आहे.


Mirabai Chanu Wins Medal: ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक, मीराबाई चानूनं जिंकलं रौप्यपदक 






 


मीराबाई चानूनं म्हटलं आहे की, हे स्वप्नवत आहे. हे पदक मी माझ्या देशाला आणि कोट्यवधी देशवासियांना समर्पित करते. माझ्या आईनं माझ्यासाठी खूप त्याग केला आहे. तिचे आभार मानावे तितके कमीच आहेत. तसेच मी भारत सरकार, क्रीडा मंत्रालय, वेटलिफ्टिंग फेडरेशन, रेल्वे आणि माझ्या या प्रवासात मदत केलेल्या प्रत्येकाचे आभार मानते. मी विशेष करुन माझे मार्गदर्शक विजय शर्मा यांची आभारी आहे ज्यांनी मला मोलाचं मार्गदर्शन केलं, असं मीराबाईनं म्हटलं आहे.  


मीराबाई चानूनं शानदार प्रदर्शन करत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात 87 किलो वजन उचललं तर  क्लीन अॅंड जर्कमध्ये मीराबाई चानूनं 115 किलो वजन उचलत पदकावर शिक्कामोर्तब केलं. मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात दुसरं पदक मिळवून दिलं आहे. भारताकडून वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे.


पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती कोविंद यांच्यासह दिग्गजांकडून मीराबाईवर कौतुकाचा वर्षाव


वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजनगटात चीनच्या जजिहूला सुवर्णपदक मिळालं आहे. मीराबाईनं भारताला मिळवून दिलेल्या पहिल्या पदकानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह दिग्गज नेत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान मोदींनी मीराबाईसोबतचा एक फोटो ट्वीट केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये यापेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही. अवघा भारत मीराबाईच्या कामगिरीनं आनंदी आहे.  भारोत्तोलनमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचं अभिनंदन. तिचं यश प्रत्येक भारतीयांना प्रेरीत करेल, असं मोदी यांनी म्हटलं आहे.