नवी दिल्ली : कर्णधार श्रेयस अय्यरने तीन चौकार आणि दहा षटकारांच्या साथीने नाबाद 93 धावांची खेळी उभारुन, दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये नवी जान ओतली. श्रेयसच्या याच खेळीच्या जोरावर दिल्लीने कोलकाता नाईट रायडर्सचा तब्बल 55 धावांनी धुव्वा उडवला.


दिल्लीचा हा सात सामन्यांमधला दुसरा विजय ठरला. दिल्लीच्या निराशाजनक कामगिरीची जबाबदारी स्वीकारुन गौतम गंभीरने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर सोपवण्यात आली.

श्रेयसने पहिल्याच सामन्यात कर्णधारास साजेशी खेळी करुन दिल्लीच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. या सामन्यात दिल्लीने पहिल्यांदा फलंदाजी करताना चार बाद 219 धावांची मजल मारली होती. त्यानंतर कोलकात्याला नऊ बाद 164 धावांचीच मजल मारता आली.

या सामन्यात दिल्लीने विजय तर मिळवला, मात्र प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, की गौतम गंभीरला अंतिम अकरामधून बाहेर बसवण्याचा निर्णय कुणाचा होता. या प्रश्नाचं उत्तर नवनियुक्त कर्णधार श्रेयस अय्यरने सामन्यानंतर दिलं.

''गंभीरला ड्रॉप करण्याचा निर्णय माझा नव्हता. त्याने स्वतःच हा निर्णय घेतला. त्याने जो निर्णय घेतला, त्यासाठी मोठी हिंमत पाहिजे. म्हणूनच यासाठी त्याचं उलट कौतुक होणंही गरजेचं आहे,'' असं म्हणत श्रेयसने गंभीरच्या निर्णयाचं कौतुकही केलं.

संबंधित बातम्या :

पृथ्वी शॉचा धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट


आयपीएल इतिहासात सर्वात कमी वयात अर्धशतक, पृथ्वी शॉचा विक्रम