RCB and April 23: सनरायजर्स हैदराबादने आरसीबीचा नऊ गड्यांनी पराभव केला. हैदराबादने आरसीबीला 68 धावांवर बाद केले. आरसीबीने आयपीएलमधील आपली दुसरी निचांकी धावसंख्या केली. यंदाच्या आयपीएलमधील ही सर्वात निचांकी धावसंख्या आहे. मार्को जानसेनच्या वेगवान माऱ्यापुढे आरसीबीची तारांबळ उडाली. जानसेन याने आपल्या पहिल्याच षटकात आरसीबीच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्त दाखवला. तेथून आरसीबीची वाताहत सुरु झाली. 16.1 षटकात संपूर्ण आरसीबीचा संघ 69 धावांत तंबूत परतला. आरसीबीच्या पराभवानंतर 23 तारखेची काही आकडेवारी समोर आली आहे. आरसीबी 23 एप्रिल ही तारीख कधीच विसरणार नाही. या दिवशी आरसीबीच्या नावावर तीन विक्रम जमा झाले आहेत. यापैकी दोन नकोशे विक्रम आहेत. पाहूयात 23 एप्रिल आणि आरसीबीतं कनेक्शन..
 
आरसीबी आणि 23 एप्रिल या तारखेचं खास कनेक्शन आहे.  23 एप्रिल 2013 रोजी आरसीबीने आयपीएलमधील सर्वात मोठी धावसंख्या नोंदवली. युनिवर्स बॉस ख्रिस गेलच्या वादळी 175 धावांच्या बळावर आरसीबीने पुण्याविरोधात 20 षटकांत 263 धावांचा डोंगर उभा केला. टी 20 क्रिकेटमधील ही सर्वाधिक धावसंख्या आहे. 
 
चार वर्षानंतर म्हणजेच 23 एप्रिल 2017 रोजी आरसीबीने आयपीएल इतिहासातल्या निच्चांकी धावसंख्येची नोंद केली. कोलकाताविरोधात आरसीबीचा संपूर्ण संघ 49 धावांत तंबूत परतला.  


त्यानंतर आज म्हणजेच 23 एप्रिल 2022 रोजी आरसीबीने  निराशाजनक कामगिरी केली. आरसीबीचा संपूर्ण संघ 68 धावांत तंबूत परतला. आरसीबीच्या खराब कामगिरीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडत आहे. अनेकजण यावर वेगवेगळे मिम्स तयार करत आहेत. 


नेमकी चूक कुठे झाली? दारुण पराभवानंतर फाफने स्पष्टच सांगितले
डु प्लेसिसने सामन्यानंतर झालेल्या पुरस्कार समारंभात पराभवाचं कारण सांगितलं. डु प्लेसिस म्हणाला की, 'आम्ही सुरुवातीच्या षटकात चार-पाच विकेट गमावत सामना घालवला. सुरुवातीला गोलंदाजांना मदत मिळत होती, पण याचा सामना करण्याचा आयडिया असायला हवी. पण आम्ही सुरुवातीलाच विकेट गमावल्या. त्यामुळे सामना तिथेच आमच्या हातून गेला होता.'  सुरुवातीची काही षटकं संपल्यानंतर खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक झाली होती. जर सुरुवातीला विकेट गेल्या नसत्या तर मोठी धावसंख्या उभारता आली असती. फलंदाजीसाठी ही खेळपट्टी पोषक असेल, असे वाटले होते. पण कोणत्याही खेळपट्टीवर तुम्हाला फलंदाजी करताना सावधनाता बाळगावी लागते, असे फाफ डु प्लेसिस म्हणाला. सामन्याच्या दुसऱ्याच षटकात मार्को जानसेन याने लागोपाठ दोन चेंडूवर दोन विकेट घेतल्या. त्यानंतर अनुज रावतला बाद करत आरसीबीला एकाच षटकात तीन धक्के दिले. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने मार्के जानसेनच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. तो म्हणाला की, मार्को जानसेन याने आपल्या पहिल्याच षटकात घातक गोलंदाजी केली. दोन्ही बाजूने चेंडू स्विंग करत त्याने विकेट घेतल्या. या षटकामुळेच आम्ही सामन्यात मागे राहिलो....