IPL Hardik Pandya Captaincy : पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबईची स्थिती सध्या ठीक नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईला लागोपाठ तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईच्या ताफ्यातील वातावरणही ठीक नसल्याचे दिसत आहे. हार्दिक पांड्या एकटा पडल्याचे अनेक प्रसंगावरुन दिसत आहे. चाहत्यांकडून त्याला हूटिंग केले जात आहे, त्याशिवाय डगआऊटमध्येही त्याला हवातसा सपोर्ट मिळत नाही.  राजस्थानविरोधातील सामन्यावेळी डगआऊटमध्ये हार्दिक पांड्या एकटाच बसलेला दिसला. त्याच्यासोबत एकही सहकारी खेळाडू नव्हता. अथवा कोच, सपोर्टस्टाफ सुद्धा नव्हता. त्यामुळे मुंबईच्या ताफ्यात सर्वकाही ठीक नसल्याचं बोलले जातेय. हार्दिक पांड्याच्या या फोटवर समालोचन करणाऱ्या माजी खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. 






 भज्जी झाला नाराज 


सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला समर्थन न मिळाल्यामुळे हरभजन सिंह नाराज झाला. तो म्हणाला की, हे फोटो चांगले वाटत नाहीत. हार्दिक पांड्याला एकट्याला सोडलं गेले आहे. संघातील सर्व खेळाडूंनी हार्दिक पांड्याला आपला कर्णधार म्हणून स्विकारायला हवं. निर्णय झाला आहे, त्यामुळे संघाने एकत्र राहायला हवं. 


रायडूचा आरोप


मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू अंबाती रायडूनेही आपलं मत नोंदवलं. हार्दिक पांड्याला संघातील खेळाडू कर्णधार म्हणून अद्याप स्विकारत नसल्याचा आरोप अंबाती रायडू याने केला. हार्दिक पांड्याला स्वतंत्र नेतृत्व करु दिलं जात नाही, असाही आरोप रायडूने केला आहे. पण जाणूनबूजून होतेय का? की चूकून होतेय ? याबाबत मला फारसं माहित नाही.  संघातील अनेक खेळाडू हार्दिक पांड्याला कन्फ्यूज करत आहेत. ड्रेसिंग रुममधील दिग्गज खेळाडू हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून स्वतंत्र काम करु देत नाही. हे कोणत्याही कर्णधारासाठी चांगला माहोल नाही, असे अंबाती रायडू म्हणाला. 


नवजोत सिंह सिद्धू यांची महत्वाची टिप्पणी - 


नवजोत सिंह सिद्धू म्हणाले की, "हार्दिक पांड्या निराश आणि उदास आहे, कारण त्याच्याकडे बोलायला काहीही नाही.  सर्वजण एकत्र येऊन खेळले, तरच संघ जिंकू शकतो, हे इतर खेळाडूंना समजलायला हवं. सर्वांनी एकत्र खेळायला हवं, जर असं नाही तर मुंबई जिंकणार नाही. डगआउटचे फोटो सर्व काही ठीक नसल्याचं सांगत आहे. "