अहमदाबाद : आयपीएल 2024 (IPL 2024) च्या क्वालिफायर-1 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) सनरायजर्स हैदराबादवर (Sun Risers Hyderabad) 8 विकेटनं विजय मिळवला. केकेआरनं मॅचमध्ये पहिल्या ओव्हरपासून वर्चस्व मिळवलं होतं. मिशेल स्टार्क आणि वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीच्या जोरावर केकेआरनं हैदराबादच्या फलंदाजांना पकड मिळवू दिली नाही. मिशेल स्टार्कनं ट्रेविस डेड सह आणखी दोघांना बाद करुन हैदराबादला धक्के दिले. राहुल त्रिपाठीच्या फलंदाजीच्या जोरावर हैदराबादनं 160 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र, व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर  केकेआरनं 14 व्या ओव्हरमध्ये विजय मिळवला. केकेआरच्या विजयानंतर रहमानुल्लाह गुरबाझनं (Rahamanullah Gurbaz) टीममध्ये कशी संधी मिळाली, आई आजारी असताना आयपीएलमध्ये का सहभागी झालो हे सांगितलं. 



यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या डावाची सुरुवात फिल सॉल्ट आणि सुनील नरेन या दोघांनी केली होती. फिल सॉल्ट आणि सुनील नरेननं केकेआरला अनेक मॅचेसमध्ये धडाकेबाज सुरुवात करुन दिली होती. मात्र, फिल सॉल्ट मायदेशी परतल्यानंतर केकेआरनं रहमानुल्लाह गुरबाझला संधी दिली होती. अफगाणिस्तानमधून आयपीएलमध्ये आलेल्या गुरुबाजनं सुनील नरेनच्या साथीनं 44 धावांची सलामीची भागिदारी केली. गुरबाझनं 14 बॉलमध्ये 23 धावा केल्या.






रहमानुल्लाह गुरबाझनं मॅचनंतर बोलताना म्हटलं की माझी आई सध्या रुग्णालयात आहे. तिला मी दररोज फोन करतो. आई रुग्णालयात असताना देखील अफगाणिस्तानातून भारतात आयपीएल खेळण्यासाठी भारतात आलोय. मला याबाबत माहिती मिळाली होती की फिल सॉल्टनं आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर कोलकाताला माझी गरज पडणार आहे. त्यामुळं मी उपलब्ध राहण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या या निर्णयामुळं मी खूश असून आई देखील आनंदी असल्याचं गुरबाझनं म्हटलं.   



कोलकाता नाईट रायडर्सनं रहमानुल्लाह गुरबाझ, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर यांच्या फलंदाजीच्या जोरावर 14 व्या ओव्हरमध्येच मॅच जिंकली. व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांमुळं केकेआरनं सहजपणे विजय मिळवला. 


दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायजर्स हैदराबादला पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली आहे. अंतिम फेरीची लढत आता 26 मे रोजी होणार आहे. 


संबंधित बातम्या : 



हरभजन सिंहने हार्दिक पांड्याची केली पाठराखण, म्हणाला, त्याची काहीच चूक नाही; रोहितला धरले जबाबदार