Gujarat Titans vs Rajasthan Royals IPL 2022 Final Rules : आयपीएलच्या 15व्या मोसमाची मेगा फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. समारोपाच्या खास कार्यक्रमानंतर रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. यंदाच्या मोसमात नव्यानं दाखल झालेला गुजरात टायटन्स आणि 14 वर्षांनी फायनलमध्ये पोहोचलेली राजस्थान रॉयल्स यांच्यात फायनलचा हा थरार पाहायला मिळणार आहे. फायनलसाठी आयपीएलचे काही नियम आहेत.. जर पावसामुळे सामना झाला नाही तर विजेत्याची निवड केली जाते... पाहूयात काय आहे नियम.. कसा घेतला जातो निर्णय..  


IPL - पाऊस लवकर थांबला नाही तर काय होणार?
आयपीएलच्या फायनलध्ये पावसाबाबत अनेक नियम आहेत. आयपीएलने फायनलसाठी राखीव दिवस ठेवलाय. पण राखीव दिवसापर्यंत पोहचण्याआधीही काही नियम आहेत. एका न्यूज वेबसाईटनुसार, जर पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला तर  9.20 पर्यंत सामना सुरु केला जाऊ शकतो.. अशावेळी एकही षटक कमी होणार नाही, सामना पूर्ण 20-20 षटकांचा होणार आहे. जर लवकर पाऊस थांबलाच नाही.. अन् 12 वाजता खेळ सुरु झाला तर सामना पाच पाच षटकांचा होईल. पाच षटकांचाही खेळ होऊ शकला नाही तर सुपर ओव्हर होणार. सुपर ओव्हर सुद्धा होऊ शकली नाही तर राखीव दिवसाचा वापर केला जाईल.. राखीव दिवशी म्हणजे, सोमवारी 30 मे रोजी सामना होणार... पण राखीव दिवशीही पावसामुळे सामना न झाल्यास गुणतालिकेनुसार विजयी घोषीत केला जाईल.. म्हणजे, दोन दिवस पावसामुळे सामना न झाल्यास हार्दिक पांड्याच्या गुजरातला विजयी घोषीत केले जाईल.  


फायनलमध्ये कुणाचं पारडं जड? 
गुजरातचा संघ पदार्पणातच यंदाच्या मोसमातला सर्वात यशस्वी संघ ठरला. हार्दिक पंड्याचं नेतृत्व, डेव्हिड मिलरचा अनुभव, रशिद खानची जादूई फिरकी यासह संघातल्या प्रत्येक खेळाडूचं मोलाचं योगदान गुजरात टायटन्सला आयपीएलच्या फायनलमध्ये घेऊन गेलंय. गुजरातचा संघ आयपीएलच्या रणांगणात नवखा असला, तरी तो पदार्पणात सर्वात यशस्वी संघ ठरलाय. हार्दिक पंड्याच्या या फौजेनं साखळीत 14  पैकी 10 सामने जिंकले. आणि मग क्वालिफायरची पायरी एकाच फटक्यात पार करुन सहजपणे फायनल गाठली. त्यामुळे फायनलमध्ये गुजरातचं पारडं जड मानलं जातंय. इकडे संजू सॅमनसनच्या राजस्थानला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी मोठा वळसा घालावा लागलाय. क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात त्यांचा गुजरातकडून पराभव झाला.पण राजस्थानची 'रॉयल' ब्रिगेड दुसऱ्या क्वालिफायरमध्ये नेटानं लढली. आणि बंगलोरला हरवून राजस्थाननं आपला 14 वर्षांचा वनवास संपवला. तुम्हाला आठवत असेल की 2008 सालच्या पहिल्यावहिल्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स हाच संघ विजेता ठरला होता. पण त्यानंतर राजस्थानला एकदाही विजेतेपद सोडा पण अंतिम फेरी गाठता आली नव्हती. त्यामुळं यंदा तब्बल 14 वर्षांनी राजस्थान फायनमध्ये खेळताना दिसणार आहे.