IPL 2022: आयपीएल 2022 मधील अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) संघानं राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंरतु, राजस्थानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकीचा ठरला. गुजरातच्या भेदक गोलंदाजीसमोर राजस्थानचा संघ डगमगताना दिसला. या सामन्यात राजस्थाननं 20 षटकात 9 विकेट्स गमावून गुजरातसमोर 131 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात गुजरातच्या संघानं 18.1 षटकात तीन विकेट्स गमावून सामना जिंकला. आयपीएल 2022 मध्ये गुजरातच्या संघाची कामगिरी कशी होती? आणि त्यांच्या विजयामागची पाच महत्वाची कारणं कोणती? यावर एक नजर टाकुयात. 


1) हार्दिक पांड्याचं उत्कृष्ट नेतृत्व
आयपीएल 2022 मध्ये गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्यानं चांगल्या पद्धतीनं आपल्या संघाच नेतृत्व केलं. आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यापूर्वी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. परंतु, हार्दिकनं त्याच्या नेतृत्वाच्या जोरावर गुजरातच्या संघाला आयपीएल 2022 चा खिताब जिंकवून दिला. मैदानात त्यानं घेतलेल्या अनेक निर्णयांनी सर्वांना प्रभावित केलं. या हंगामात हार्दिक पांड्यानं फलंदाजीसह गोलंदाजीनंही दमदार प्रदर्शन करून दाखवलं आहे.  गुजरात टायटन्सचा चॅम्पियन होण्यामागे हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाचा मोठा वाटा मानला जातो.


2) आशिष नेहराची रणनीती
आशिष नेहरानं गुजरातचा प्रशिक्षक म्हणून उत्तम कामगिरी केली. आशिष नेहरानं गुजरात टायटन्सच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली, असं माजी भारतीय खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफसारखे दिग्गज खेळाडूंना वाटतंय. त्यानं कर्णधार हार्दिक पंड्यासोबत चांगली रणनीती आखली आणि मैदानावर काम केलं. हे लक्षात घेण्यासारखे आहे की माजी भारतीय खेळाडू आशिष नेहरा यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या कोचिंग स्टाफचा भाग होता.


3) डेथ ओव्हर्समधील गुजरातची फलंदाजी
गुजरातच्या फलंदाजांनी अनेक सामन्यात अखेरच्या काही षटकात धमाकेदार फलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला आहे. विशेषतः डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांनी डेथ ओव्हरमध्ये अप्रतिम फलंदाजी केली. तर, काही सामन्यात गुजरातचा अष्टपैलू राशिद खाननंही आपल्या बॅटची उत्कृष्टता दाखवली. दरम्यान, चेन्नईविरुद्ध साखळी सामन्यात राशिद खान आणि डेव्हिड मिलरनं 3 षटकात 50 कुटल्या. ज्यामुळं गुजरातला चेन्नईला पराभूत करता आलं. याशिवाय, पंजाब किंग्जविरुद्ध सामन्यात राहुल तेवतियानं अखेरच्या दोन षटकात 12 धावांची गरज असताना सलग दोन षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर पहिल्या क्वालिफायरमध्ये राजस्थानविरुद्ध सामन्यात डेव्हिड मिलरनं अखेरच्या षटकात 16 धावांची गरज असताना प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार ठोकून गुजरातला विजय मिळवून दिला.


4) आयपीएल 2022 मध्ये गुजरातच्या गोलंदाजाची हवा
आयपीएल 2022 मध्ये गुजरातच्या गोलंदाजांनी संपूर्ण हंगामात दमदार गोलंदाजी केली. पॉवरप्ले ओव्हरमध्ये लॉकी फर्ग्युसन आणि मोहम्मद शमीसारख्या वेगवान गोलंदाजांनी विकेट घेतल्या. त्याचवेळी राशिद खान आणि राहुल तेवतिया या गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेण्यासोबतच धावगतीवरही नियंत्रण ठेवलं. कर्णधार हार्दिक पंड्यानंही संपूर्ण हंगामात चमकदार गोलंदाजी केली. गुजरात टायटन्सच्या या बॉलिंग युनिटसमोर बहुतेक विरोधी संघांच्या फलंदाजांना धावा काढण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.


5) टॉप ऑर्डरमध्ये गुजरातच्या फलंदाजाचं चांगलं प्रदर्शन
शुभमन गिल, वृद्धिमान साहा यांच्यासह वरच्या फळीतील फलंदाजांनी अनेक सामन्यात संघासाठी धावा केल्या. या हंगामात कर्णधार हार्दिक पांड्यानेही स्वत:ला प्रोत्साहन देत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. गुजरात टायटन्सच्या टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी सहज धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्यानं या हंगामात 15 सामन्यात 487 धावा केल्या आहेत. यादरम्यान पंड्याचा स्ट्राइक रेट 131.27 होता. तर, सरासरी 44.27 होती. याशिवाय या हंगामात त्यानं आठ विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत.


हे देखील वाचा-