दुबई: इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीजनच्या अंतिम सामन्यात आज दोन बलाढ्य संघ, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स समोरासमोर येत आहेत. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या आजच्या अंतिम सामन्यात आयपीएलचा चषक कोणाच्या पारड्यात पडणार हे स्पष्ट होईल. मुंबई आयपीएलच्या आपल्या पाचव्या विजयाचा पताका फडकवण्याच्या तयारीत आहे तर दिल्ली कॅपिटल्स आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे.


दिल्लीच्या संघाने पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. दिल्लीचा संघ आयपीएलच्या आठ संघांपैकी एकमेव संघ होता जो आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचू शकला नव्हता. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्लीच्या संघाने ही प्रतिक्षा संपवली आहे. आता अनुभवी आणि बलाढ्य असणाऱ्या मुंबईच्या संघासमोर दिल्ली काय चमत्कार करेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे.


या हंगामात दोन्ही संघ तीन वेळा एकमेकांसमोर उभ्या ठाकले होते. या तिनही वेळी मुंबईने दिल्लीला पराभवाचा धक्का दिला होता. लीगमधील दोनही सामन्यात मुंबईने विजय प्राप्त केला होता. प्ले ऑफमध्ये क्वॉलिफायरच्या सामन्यातही दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला होता.





दिल्ली कॅपिटल्स चांगल्या फॉर्म मध्ये
दिल्ली ने त्यांच्या दुसऱ्या क्व़ॉलिफायरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करुन अंतिम सामन्यातील आपले स्थान पक्के केले होते. या संघाचे वैशिष्ट्य म्हणजे गोलंदाज आणि फलंदाजीमध्ये असलेले संतुलन. गेल्या सामन्यात दिल्लीने त्यांच्या फंलदाजीच्या क्रमाकांत बदल केले होते. ओपनिंगला शिखर धवनच्या साथीत मार्कस स्टोएनिसला पाठवले होते आणि हा प्रयोग यशस्वी झाला होता.


मुंबईच्या विरोधात दिल्लीची ही सलामीची जोडी कमाल दाखवते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अजिंक्य रहाणे देखील ओपनिंग करु शकतो. स्टोएनिस ओपनिंगला आला तर खालच्या क्रमांकावर शिरमन हॅटमायरवर फिनिशिंगची जबाबदारी असेल. हैदराबादच्या सामन्यात त्याने ही जबाबदारी चांगल्या पध्दतीने पार पाडली होती. ऋषभ पंत देखील संघात आहे ज्याची फलंदाजी या हंगामात काही कमाल करु शकली नाही.


गोलंदाजीमध्ये रबाडा आणि एनरिक नॉर्खियावर मुख्य जबाबदारी असेल. सुरुवातीच्या वेळी मुंबईच्या काही विकेट काढून मुंबईवर दबाब टाकण्याची जबाबदारी या दोघांवर असेल.


रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा
मुंबईची फलंदाजी मजबुत आहे. त्यामुळे ते कोणत्याही प्रकारच्या गोलंदाजीचा सामना करु शकतात. कर्णधार रोहित शर्मा आणि डी कॉक यांची सलामीची जोडी भक्कम आहे. रोहितने दुखापतीनंतर पुनरागमन केल्यानंतर मोठी खेळी केली नाही. डि कॉक मात्र सातत्याने धावा करण्यात यशस्वी ठरला आहे.


मधल्या फळीत फलंदाजीला येणारे सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन हे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. त्यांच्यानंतर हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड और क्रूणाल पांड्या हे देखील फलंदाजीत कमाल दाखवत आहेत.


मुंबईच्या गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट दोन जागतिक स्तरावरचे नावाजलेले गोलंदाज आहेत. आतापर्यंत या दोघांनीच संघाच्या गोलंदाजीची कमान सांभाळली आहे. तिसऱ्या गोलंदाजाच्या रुपात जेम्स पॅटिरसन आणि नॉथन कुल्टर नाईल यांच्यापैकी एकाला खेळण्याची संधी मिळेल.


या सामन्यात सर्वात महत्वाचा आहे तो टॉस. दुसऱ्या हाप मध्ये मैदान सुके पडण्याच्या शक्य़तेने टॉस महत्वाची भूमिका बजावू शकतो. दोन्ही संघ हे ध्यानात ठेवतील.


संभाव्य संघ:


दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, शिखर धवन, शिमरन हेटमायेर, अक्षर पटेल, मार्कस स्टोयनिस, रविचंद्रन अश्विन, रबाडा, एनरिक नॉर्खिया, प्रवीन दुबे.


मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव/क्रूणाल पांडया, कीरन पोलार्ड, जेम्स पैटिनसन/नाथन कुल्टर नाईल, ट्रेंट बोल्ट.


महत्वाच्या बातम्या:


IPL 2020 : मुंबईसाठी डोकेदुखी ठरू शकतो दिल्लीचा 'हा' हुकूमाचा एक्का!


Women's t20 challenge 2020 | ट्रेलब्लेझर्स संघाला पहिलेवहिले विजेतेपद, सुपरनोव्हाजवर 16 धावांनी विजय