IPL Young Stars in Team India : आयपीएल (IPL 2023) संपताच क्रिकेट चाहत्यांना WTC चं वेध लागेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (World Test Championship) अंतिम सामना ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाला लंडनमधील ओव्हल मैदानावर 7 जून ते 11 जून दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर अफगाणिस्तानविरुद्ध छोटी सीरिज खेळायची आहे. यावेळी, आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या काही युवा खेळाडूंना संधी मिळू शकते.


IPL मधील युवा खेळाडूंचा टीम इंडियात प्रवेश


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर जून महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ मोठ्या दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजला रवाना होईल. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी, वनडे आणि टी-20 सामने खेळणार आहे. या दौऱ्याचं पूर्ण वेळापत्रक अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, याच काळात होणारी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिका धोक्यात असल्याचं बोललं जात आहे. सध्या समोर आलेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडिया युवा ब्रिगेड मैदानात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी बीसीसीआय घेणार मोठा निर्णय 


पीटीआयच्या रिपोर्टनुसार, भारतीय संघाच्या वरिष्ठ खेळाडूंना वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी विश्रांती देण्याच्या विचारात आहे. त्यामुळे या काळात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताची दुसरी यंग टीम म्हणजेच युवा ब्रिगेड अफगाणिस्तान दौऱ्यावर पाठवली जाऊ शकते. विशेष म्हणजे दोन महिने आयपीएल खेळल्यानंतर आता संघातील 15 खेळाडू इंग्लंडला रवाना झाले आहेत. काही खेळाडू आधीच इंग्लंला पोहोचले आहेत. तर, काही खेळाडू 28 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना पार पडल्यानंतर इंग्लंडसाठी रवाना होतील. दरम्यान, हार्दिक पांड्या हा कसोटी संघाचा भाग नाही, त्यामुळे तो अफगाणिस्तानविरुद्धची जबाबदारी सांभाळू शकतो.


यशस्वी, रिंकू आणि तिलकला भारतीय संघात प्रवेश मिळणार? 


भारत आणि अफगाणिस्तान मालिका 20 ते 30 जून या काळात पार पडण्याची शक्यता आहे. या काळात, टीम इंडिया एकदिवसीय किंवा टी 20 यापैकी एक मालिका खेळू शकते. यादरम्यान, आयपीएल 2023 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंनाही टीम इंडियामध्ये प्रवेश मिळू शकतो. याशिवाय आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारे यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंह आणि तिलक वर्मा या युवा खेळाडूंनाही संधी मिळू शकते.


संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी यांनाही संधी मिळण्याची शक्यता


तसेच टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या अनेक खेळाडूंनाही या संघात प्रवेश मिळण्याची ही संधी आहे. संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी सारखे खेळाडू या संघाचा भाग असू शकतात. तर सूर्यकुमार यादव या संघाचा महत्त्वाचा भाग असू शकतो. 


अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मिरवाईस अश्रफ हे सध्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीसाठी भारतात आहेत. आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर निश्चित केलं जाईल. त्याचबरोबर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील या मालिकेबाबतही यावेळी अंतिम निर्णय होऊ शकते. टीम इंडिया 12 जुलै ते 13 ऑगस्ट याकाळात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. यावेळी दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळवले जातील. या दौऱ्यानंतर भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर जाईल. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


WTC Final 2023 भारतीय वेळेनुसार कधी सुरु होणार सामना, सर्व माहिती एका क्लिकवर