CSK vs MI, IPL 2022 : वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबईने चेन्नईचा पाच गड्याने पराभव केला. या पराभवासह चेन्नईचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले. वानखेडे मैदानावर सामन्यादरम्यान चक्क लाइट गेल्याचा प्रकार घडला होता.. होय.. सामना सुरु झाल्यानंतर काही वेळातच हा प्रकार घडला होता. चेन्नईची फलंदाजी सुरु असताना पहिल्याच षटकात वानखेडेवरील बत्ती गुल झाली होती. 


वानखेडे मैदानाची लाईट गेल्यामुळे नाणेफेकीला उशीर झाला.. त्यामुळे पहिल्या चार षटकात दोन्ही फलंदाजांना डीआरएस घेता आला नाही. याचा फटका चेन्नईला सर्वाधिक झाला. पहिल्याच षटकात डॅनिअल सॅम्सने डेवॉन कॉनवेला शुन्यावर पायचीत केले. पण मात्र या क्लोज डिसिजनवर कॉनवेला DRS घेता आला नाही. त्यामुळे चेंडू लेगस्टम्पवर आदळणार होता की लेग स्टम्पच्या बाजूने जाणार होता हे निश्चित करता आले नाही. दुसरीकडे जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) दुसऱ्या षटकात रिव्ह्यू मागितला मात्र त्याला मैदानावरील अंपायरचा निर्णयच मान्य करावा लागला. डेवेन कॉन्वेचा चेंडू लेगसाइडला जात असल्याचे दिसत होते. पण तांत्रिक कारणामुळे डीआरएस घेता आला नाही. याचा फटका चेन्नईला बसला. तुफान फॉर्मात असणारा कॉन्वेला तंबूत परतावे लागले. कॉन्वेला बाद दिल्यानंतर पंचाच्या निर्णायवर धोनी नाराज असल्याचे दिसत होते. तंबूत असणाऱ्या धोनीची नाराजी दिसत होती. 
 
वानखेडे स्टेडिअमवर बत्ती गुल झाल्याबाबत इंडियन एक्सप्रेसला मुंबई क्रिकेट असोसिएशनने स्पष्टीकरण दिले.. एमसीएचे अधिकारी म्हणाले की,  'नाणेफेकीपूर्वी शॉर्ट सर्किट झाले होते. त्यामुळे थोडा बिघाड झाला. नाणेफेकीलाही थोडा उशीर झाला. फ्लडलाईटला पुरेसा वीजपुरवठा होत नव्हता. याचबरोबर ब्रॉडकास्ट प्रॉडक्शनवरही परिणाम झाला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी यंत्रणा सुरळीत चालावी यासाठी प्रयत्न केले.' मिळालेल्या माहितीनुसार डिझेल जनरेटरमध्ये काही बिघाड झाला होता. इथूनच ब्रॉडकास्ट प्रॉडक्शनला वीज पुरवठा होतो. त्यानंतर एमसीएने ब्रॉडकास्टला बॅक अप पॉवर सप्लाय दिला. मात्र हा सप्लाय कार्यान्वित होण्यासाठी वेळ लागला. 


सामन्यात काय झाले?
तिलक वर्माच्या 34 धावांच्या खेळीच्या बळावर मुंबईने चेन्नईवर पाच गड्यांनी विजय मिळवलाय. कर्णधार एमएस धोनीच्या 36 धावांच्या खेळीच्या बळावर चेन्नईने दिलेल्या 98 धावांच्या आव्हानाचा मुंबईने यशस्वी पाठलाग केला. मुंबईने 14.5 षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात 103 धावा केल्या. डॅनिअल सॅम्स आणि तिलक वर्मा मुंबईच्या विजयाचे शिल्पकार झाले.