IPL 2020, MIvsRCB : आयपीएलच्या 48 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर आमनेसामने असतील. मुंबई आणि बंगलोर या दोन्ही संघांना आज प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी असणार आहे. दोन्ही संघांचे 11-11 सामन्यात 14-14 गुण आहेत. मुंबईचा रन रेट चांगल्या असल्याने पहिल्या स्थानवर आहे, तर बंगलोर दुसऱ्या स्थानावर आहे.


मुंबई आणि बंगलोर पैकी जो संघ आजचा सामना जिंकेल तो संघ प्ले ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरेल. आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी 16 गुणांची आवश्यकता आहे, तर दोन्ही संघ प्ले ऑफमध्ये पोहोचण्यापासून एक पाऊल दूर आहेत.


मुंबई इंडियन्सची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली आहे. मात्र मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची दुखापत संघाची सर्वात मोठी अडचण बनली आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित शर्मा शेवटच्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकलेला नाही. रिपोर्ट्सनुसार रोहित शर्माच्या बंगलोरविरुद्धच्या सामन्यात खेळेल याची शक्यताही तितकीच कमी आहे. कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व कायरन पोलार्डकडे आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ईशान किशन सलामीला फलंदाजीसाठी मैदानात उतरेल.


IPL 2020: अर्ध्या सिझनपर्यंत नंबर वन असलेल्या दिल्लीवर प्ले ऑफमधून बाहेर होण्याचं संकट!


तर, रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरला मागच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात या सीजनमध्ये पहिल्यांदा बंगलोरच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली. मात्र मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात संघ जोरदार पुनरागमन करले अशी कर्णधार विराट कोहलीला आशा आहे.आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघात कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही.


राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करल्यानंतरही 14 गुणांसह मुंबईचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून पराभूत झालेल्या बंगलोरचा संघही 14 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ‘आयपीएल’ गुणतालिकेत सुरक्षित असलेल्या या संघांपैकी जो संघ जिंकेल, तो बाद फेरीमधील स्थान पक्के करणार आहे.