IND vs ENG 2nd ODI:  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज श्रेयस अय्यर पहिल्या सामन्यात खांद्याला झालेल्या दुखापतीमुळं बाहेर झाला आहे. बीसीसीआयनं याबाबत गुरुवारी माहिती दिलीय. इंग्लंड संघाची फलंदाजी सुरू असताना आठव्या षटकात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने मारलेला फटका रोखताना श्रेयसला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर श्रेयसला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.


अहवालानुसार, श्रेयस काही दिवस क्रिकेटपासून दूर राहणार असल्याची माहिती आहे. अय्यरच्या जागी दुसऱ्या वनडेत ऋषभ पंत किंवा सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते.  श्रेयसनं ट्वीट करत म्हटलं, लवकर परत येईल  श्रेयस संघाबाहेर गेल्याचं कळताच त्याच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना करत काळजी व्यक्त केली आहे. यावर ट्वीट करत श्रेयस अय्यरनं म्हटलं आहे की, मी आपले संदेश वाचत आहे. आपल्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. आपले सर्वांचे आभार. मी लवकरच परतेल, असं तो म्हणाला.  






भारताची मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी  इंग्लंडच्या संघाविरोधात सुरु असणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या पहिल्या सामन्यात भारतानं विजय मिळवत मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं इंग्लंडपुढे 318 धावांचं आव्हान ठेवलं होतं. 318 धावा करण्यासाठी मैदानात उरलेल्या इंग्लंडचे सर्व खेळाडू 251 धावसंख्येवर तंबूत परतले. प्रसिद्ध कृष्णानं पदार्पणाच्याच सामन्यात 54 धावा देत 4 गडी बाद करण्याची किमया केली होती.