मुंबई : परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अशातच याप्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून विरोधकांकडून सातत्यानं गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्यापासून भाजपचे राज्यातील नेते सैरभैर झाले असून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम ते करत आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान असून भाजपच्या या कृतीला लोक कंटाळले आहेत, असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच वेळ पडली तर सरकारने फडणवीस यांचीही चौकशी करावी, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

  


"महाराष्ट्रातील सत्ता गेल्यापासून भाजपचे राज्यातील नेते सैरभैर झाले असून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम ते करत आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान असून भाजपच्या या कृतीला लोक कंटाळले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बेछूट, बेलगाम आणि बालीश आरोप करत आहेत. सीडीआरबद्दलही ते विधानसभेत खोटं बोलले असून ते सातत्याने खोटं बोलत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून ते महाराष्ट्राविरोधात कुभांड रचत आहेत. वेळ पडली तर सरकारने फडणवीस यांचीही चौकशी करावी.", असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. 


पाहा व्हिडीओ : "फोन टॅपिंगप्रकरणी विरोधकांकडून होणारे आरोप खोटे, राज्य सरकार खरी माहिती देणार" : नाना पटोले



नाना पटोले म्हणाले की, "रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करण्याचे अधिकार होते का? याची चौकशी केली जाणार आहे. काही अधिकारी केंद्राच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, त्यांनी कोणाच्या हातचे बाहुले बनू नये. त्यांनी जनतेची कामं केली पाहिजे. सरकार येतं आणि जातं पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणातही भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांना आणि माध्यमांना हाताशी धरून चार महिने महाराष्ट्राला बदनाम केलं. महाराष्ट्र खुनी राज्य असल्याचं चित्र निर्माण केलं गेलं." पुढे बोलताना ते म्हणाले की, "आताही केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून फडणवीस तेच करत आहेत. ते मुख्यमंत्री असताना न्यायाधीश असल्यासारखे सर्वांना क्लिन चिट देत सुटले होते. फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होते, त्यावेळी त्यांनी राजीनामे दिले होते का? नरेंद्र मोदी यांच्यावरही आरोप आहेत, त्यांनी राजीनामा दिला का? मग अनिल देशमुख यांचा राजीनामा मागण्याचा त्यांना काय अधिकार? सध्याच्या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल, चुकीला माफी नाही."


"परमबीर सिंह, रश्मी शुक्ला प्रकरणी सरकारच्या घटक पक्षात कोणतेही मतभेद नाहीत आणि सरकार बॅकफुटवरही नाही, काही लोक जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी अशा अफवा पसरवत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांना भेटण्याची वेळ मागितलेली असून त्यांची वेळ मिळताच महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार आहे.", अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली.


शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व करावे या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा नाना पटोले यांनी यावेळी बोलताना समाचार घेतला. ते म्हणाले की, "संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का? शिवसेना ही युपीएची घटक पक्षही नाही. संजय राऊत यांना युपीएच्या नेतृत्वाबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही. सोनिया गांधी या नेतृत्व करण्यास सक्षम आहेत. युपीएची चिंता संजय राऊत यांनी करु नये." 


महत्त्वाच्या इतर बातम्या :