नवी दिल्ली : टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणार की नाही, या प्रश्नाचं उत्तर उद्या (रविवार) नवी दिल्लीत होणाऱ्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत मिळण्याची शक्यता आहे.


महसूल वाटपाच्या मुद्द्यावरून आयसीसीसोबत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीचा संघ अजूनही जाहीर केलेला नाही. मात्र बीसीसीआयच्या विशेष सभेच्या एक दिवस आधीच बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सी के खन्ना यांनी टीम इंडिया या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

या स्पर्धेसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ सोमवारी म्हणजे आठ मे रोजी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

इंग्लंडमध्ये 1 जून रोजी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात होणार आहे. यासाठी बहुतांश देशांची संघ निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र टीम इंडियाची अजूनही घोषणा करण्यात आलेली नाही.

भारत चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी झाल्यानंतर भारताची पहिलीच लढत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत 4 जूनला होणार आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीकडे जगभरातल्या क्रिकेटप्रेमींचे डोळे लागले आहेत.

संबंधित बातम्या :

चॅम्पियन्स ट्रॉफी : हरभजनची आठ जणांच्या सदिच्छादूतांमध्ये निवड


"चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तातडीने भारतीय संघ जाहीर करा"