India vs New Zealand Test : बंगळुरूमध्ये अनेक नवीन गोष्टी घडत आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे पूर्णपणे वाहून गेला असला तरी, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सामना रंगला तेव्हा तो खूपच रंजक होता. पहिल्या दिवशी न्यूझीलंडचे पूर्ण वर्चस्व असले तरी तिसऱ्या दिवशी भारताने पुनरागमन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आता सामन्याला दोन दिवस उरले आहेत. म्हणजेच शनिवारी आणि रविवारीही सामने होतील. दरम्यान,   बंगळुरू कसोटी हरली तर टीम इंडिया WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडणार का? हा प्रश्न  चाहत्यांना पडला आहे. 


भारतीय संघाने हा सामना हारला तर त्यांचा अंतिम फेरीचा मार्ग थोडा कठीण होऊ शकतो. खरंतर, सध्या भारतीय संघ 74.24 टक्के गुणांसह WTC गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया 62.50 विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे.


डब्ल्यूटीसी फायनलसाठी कसे असेल समीकरण 


बंगळुरू कसोटीनंतर भारतीय संघाला 2023-25 या WTC मोसमात आणखी 7 सामने खेळावे लागणार आहेत. अशा स्थितीत भारतीय संघाला उर्वरित 7 पैकी किमान 4 सामने जिंकावे लागणार आहेत. 4 सामने जिंकले तर जागा जवळपास निश्चित होईल. 3 कसोटी जिंकायचे झाल्यास, भारताला दुसऱ्या संघाच्या विजयावर किंवा पराभवावर अवलंबून राहावे लागेल.


भारतीय संघाला पुढील 7 सामने फक्त न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे आहेत. यामध्ये सध्याच्या मालिकेतील शेवटचे 2 सामने किवी संघाविरुद्ध खेळावे लागतील. तर कांगारू संघाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ही तिसरी सायकल आहे, जे 2023 ते 2025 पर्यंत चालेल. आयसीसीने या तिसऱ्या सायकलसाठी पॉइंट सिस्टमशी संबंधित नियम आधीच जारी केले आहेत. कसोटी सामना जिंकल्यास संघाला 12 गुण, सामना अनिर्णित राहिल्यास 4 गुण आणि सामना बरोबरीत सुटल्यास 6 गुण मिळतील.


सामना जिंकल्यावर 100 टक्के गुण जोडले जातील, टाय झाल्यावर 50 टक्के, ड्रॉ झाल्यावर 33.33 टक्के आणि पराभवावर शून्य टक्के गुण जोडले जातील. दोन सामन्यांच्या मालिकेत एकूण 24 गुण मिळतील आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 60 गुण मिळतील. रँकिंग प्रामुख्याने WTC टेबलमधील विजयाच्या टक्केवारीच्या आधारे निर्धारित केले जाते.


डब्ल्यूटीसी पॉइंट सिस्टम


- विजयावर 12 गुण
- सामना बरोबरीत सुटल्यास 6 गुण
- सामना अनिर्णित राहिल्यास 4 गुण
- जिंकलेल्या गुणांच्या टक्केवारीवर आधारित संघांची क्रमवारी लावली जाते.
- अव्वल दोन संघ 2025 मध्ये लॉर्ड्सवर होणाऱ्या अंतिम फेरीत पोहोचतील.
- स्लोओव्हर दर असल्यास गुण वजा केले जातात.