IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय मालिकेत भारताने वेस्ट इंडिजवर 200 धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या 352 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची आघाडी फळी ढेपाळली. विडिंजचा संपूर्ण डाव 151 धावांत संपुष्टात आला. विडिंजच्या तळाच्या फलंदाजांनी जिगरबाज फलंदाजी करत मोठी नामुष्की टाळली. शार्दूल ठाकूर याने चार विकेट घेतल्या तर मुकेश कुमार याने तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. कुलदीप यादवने दोन विकेट घेतल्या. तिसरा सामना जिंकून भारतीय संघाने मालिका 2-1 च्या फरकाने खिशात घातली.


भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना विडिंजची सुरुवात अतिशय खराब झाली. भारताच्या भेदक माऱ्यापुढे विडिंजची आघाडीची फळी ढेपाळली. वेस्ट इंडिजचे आठ फलंदाज अवघ्या ८८ धावांत तंबूत परतले होते. तळाच्या फलंदाजांनी जिगरबाज खेळी करत विडिंजची धावसंख्या 151 पर्यंत पोहचवले. आघाडीच्या फलंदाजात फक्त एलिक एथांजे याने भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार केला. त्याचा अपवाद वगळता एकालाही मोठी खेळी करता आली नाही. एलिक एथांजे याने 32 धावांची खेळी केली. तळाच्या फलंदाजांनी लाज राखली. गुडाकेश मोटी याने नाबाद ३९ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि चार चौकार लगावले. त्याशिवाय अल्जारी जोसेफ याने दोन षटकाराच्या मदतीने २६ धावांची खेळी केली. यानिक कैरियाह याने तीन चौकाराच्या मदतीने 19 धावांची खेळी केली. 


वेस्ट इंडिजचे आघाडीचे फलंदाज भारतीय गोलंदाजीपुढे फेल गेले. विडिंजच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. ब्रँडन किंग, काइल मेयर्स, शाय होप , शिमरोन हेटमायर, कीसी कार्टी, रोमारियो शेफर्ड, कॅची कार्टी आणि जेडेन सील्स यांना दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. 


भारताच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच विडिंजच्या फलंदाजांवर अंकूश ठेवला. अचूक टप्प्यावर मारा करत विडिंजच्या फलंदाजांना तंबूत पाठवले. मुकेश कुमार याने सुरुवातीला तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. शार्दूल ठाकूर याने विडिंजची मधली फळी तंबूत पाठवली. शार्दूल ठाकूर याने चार फलंदाजांना बाद केले. त्याशिवाय कुलदीप यादव याने दोन फलंदाजांना बाद केले. 


भारताने उभारला 351 धावांचा डोंगर


सलामी फलंदाज ईशान किशन आणि शुभमन गिल यांनी भारताला दमदार सुरुवात करुन दिली. ईशान किशन याने वादळी अर्धशतक झळकावले. ईशान किशन याने ६४ चेंडूमध्ये ७७ धावांची खेळी केली. या खेळीत ईशान किशन याने आठ चौकार आणि तीन षटकार ठोकले. ईशान किशन याने सुरुवातीपासूनच वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. ईशान किशन याने प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली. ईशान किशन आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी १४३ धावांची भागिदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. ईशान किशन बाद झाल्यानंतर शुभमन गिल याने डावाची सुत्रे हातात घेतली. शुभमन गिल याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली.  त्यानंतर आक्रमक फलंदाजी केली. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याला संधीचे सोनं करता आले नाही. ऋतुराज गायकवाड ८ धावा काढून तंबूत परतला. 


ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि संजू सॅमसन यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी एकेरी दुहेरी धावसंख्यासोबत चौकार आणि षटकार ठोकले. संजू सॅमसन याने आक्रमक फलंदाजी केली. संजू सॅमसन याने ४१ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. या खेळीमध्ये संजू सॅमसन याने चार षटकार आणि दोन चौकार ठोकले. संजू बाद झाल्यानंतर शुभमन गिलही तंबूत परतला.  शुभमन गिल आणि संजू सॅमस न यांनी तिसऱ्या विकेटाठी ६९ धावांची भागिदारी केली. शुभमन गिल याने ९२ चेंडूमध्ये ८५ धावांचे योगदान दिले. या खेळीत गिल याने ११ चौकार लगावले. 


शुभमन गिल परतल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी धावसंख्या हालती ठेवली. दोघांनी अर्धशतकी भागिदारी केली. पण मोक्याच्या क्षणी सूर्यकुमार यादव बाद झाला. सूर्यकुमार यादवने दोन चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने ३५ धावांचे योगदान दिले. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी ६५ धावांची भागिदारी केली.


हार्दिक पांड्याचा फिनिशिंग टच - 


हार्दिक पांड्याने अखेरच्या षटकांमध्ये वादळी फलंदाजी केली. सूर्या बाद झाल्यानंतर हार्दिकने वादळी फलंदाजी केली. रविंद्र जाडेजाला हाताशी धरत भारताची धावसंख्या ३५० पार नेली. हार्दिक पांड्याने नाबाद ७० धावांची खेळी केली. या खेळीत पांड्याने पाच गगनचुंबी षटकार ठोकले. त्याशिवाय ४ खणखणीत चौकारही लगावले. रविंद्र जाडेजा याने नाबाद आठ धावांची खेळी केली. हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांनी १९ चेंडूत नाबद ४२ धावांची भागिदारी केली. 



वेस्ट इंडिजकडून एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही.  रोमरिओ शेफर्ड याने ७३ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. अल्जारी जोसेफ, मोटी यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली