Delhi Vijay Hazare Trophy Squad : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाणारी विजय हजारे ट्रॉफीच्या आगामी हंगामाची सुरुवात 24 डिसेंबरपासून सुरू होत आहे. यासाठी दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन (DDCA)ने आपल्या संभाव्य संघाची घोषणा केली आहे. या स्क्वाडमध्ये टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहलीचा (Virat Kohli) देखील समावेश करण्यात आला आहे. नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वनडे मालिकेदरम्यान कोहलीने जबरदस्त फॉर्म दाखवला होता.
कोहलीसोबतच विकेटकीपर ऋषभ पंतलाही (Rishabh Pant) संभाव्य संघात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, DDCA ने या स्क्वाडमध्ये बहुतेक तेच खेळाडू कायम ठेवले आहेत, जे याआधी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून मैदानात उतरले होते.
कोहली-पंत दिल्लीसाठी किती सामने खेळणार?
काही महिन्यांपूर्वी बीसीसीआयने सर्व वरिष्ठ खेळाडूंना गरजेनुसार देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळण्याचे निर्देश दिले होते. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्त झाले आहेत आणि आता फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळत आहेत. त्यामुळे कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये उतरतील, अशी शक्यता आधीपासूनच व्यक्त होत होती.
यामुळेच दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने कोहलीला संभाव्य स्क्वाडमध्ये स्थान दिले आहे. भारताची पुढील वनडे मालिका जानेवारी 2026 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध होणार असल्याने (11 जानेवारीपासून), कोहली दिल्लीसाठी ग्रुप स्टेजमधील बहुतेक सामने खेळतील, अशी अपेक्षा आहे. दिल्लीचा पहिला सामना 24 डिसेंबर रोजी तर ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना 8 जानेवारीला खेळवला जाईल.
कोहली शानदार फॉर्ममध्ये, पंतकडे सर्वांची नजर
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत विराट कोहलीने 300+ धावा केल्या आणि दोन शतके तसेच एक नाबाद अर्धशतक झळकावले. त्याचा फॉर्म पाहता दिल्लीसाठी हा मोठा फायदा ठरणार आहे. दुसरीकडे, ऋषभ पंतसाठीही हा हंगाम महत्वाचा असणार आहे. आफ्रिका मालिकेत त्याला एकही वनडे खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे विजय हजारे ट्रॉफीत आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित करण्याची त्याच्याकडे उत्तम संधी असेल.
हे ही वाचा -