नवी दिल्ली : आयसीसीनं  2024(ICC)च्या टी 20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup 2024 ) आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत (USA) केलं होतं.अमेरिकेच्या संघानं देखील टी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभाग घेतला होता.भारतासह इतर संघांचे सामने न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते. नासाऊ काऊंटीच्या खेळपट्टीवरुन आयसीसीला रोषाला सामोरं जावं लागलं होतं. ग्रुप स्टेजमधील सामने संपल्यानंतर वर्ल्ड कपचे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात आले होते. अमेरिकेच्या संघानं देखील सुपर 8 मध्ये प्रवेश केला होता. भारतानं दक्षिण आफ्रिकेला रोमांचक लढतीत 7 धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकावलं. आयसीसीची उद्यापासून कोलंबोमध्ये वार्षिक बैठक होणार आहे. या बैठकीत टी 20 वर्ल्ड कप अमेरिकेत आयोजित केल्यानं झालेल्या नुकसानाबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. 


आयसीसीची वार्षिक परिषद कोलंबोमध्ये 19 जुलैपासून सुरु होणार आहे. या बैठकीत टी 20 वर्ल्ड कपमधील ज्या मॅचेस अमेरिकेत आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये तोटा झाल्याचा मुद्दा देखील चर्चेला घेतला जाऊ शकतो. आयसीसीच्या अपेक्षेपेक्षा जास्त खर्च अमेरिकेत सामने आयोजित करण्यासाठी झाल्याची बाब चर्चेत येण्याची शक्यता आहे. आयसीसीला अमेरिकेत नेमका किती तोटा झाला याबाबतची अंतिम आकडेवारी निश्चित झालेली नाही. कारण, तिकीटांच्या माध्यमातून नेमकी किती रक्कम गोळा झाली याचं ऑडिट झालेलं नाही.  आयसीसीचा अमेरिकेत सामने आयोजित करताना अपेक्षेपेक्षा जास्त खर्च झाला. तो खर्च 150 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स पर्यंत गेल्याची माहिती आहे.


न्यूयॉर्कमध्ये सामने आयोजित करणं भोवलं


टी 20 वर्ल्ड कपचे संचालक ख्रिस टेटली यांनी देखील राजीनामा दिला आहे.   टी 20 वर्ल्ड कप आयोजनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आयसीसीला तिकीट विक्रीतून चांगली रक्कम मिळेल, अशी आशा होती. मात्र, न्यूयॉर्कमध्ये सामने आयोजित करण्याच्या निर्णयामुळं आयसीसीच्या काही सदस्स्यांनी नाराजी दर्शवली होती. नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवरील खेळपट्टीच्या मुद्यावरुन देखील आयसीसीला रोषाला सामोरं जावं लागलं होतं. न्यूयॉर्कऐवजी दुसऱ्या शहरांमध्ये टी 20 वर्ल्ड कपचे सामने आयोजित करण्याबाबत विचार का झाला नाही असा देखील प्रश्न निर्माण झाला होता. 


न्यूयॉर्कमधील टी 20 वर्ल्डकपचे सामने संपल्यानंतर नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडिमय तिथून हटवण्यात आलं होतं. नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडिमयवर मोठी धावसंख्या उभारण्यात संघांना अपयश आलं होतं. भारतानं पाकिस्तान विरुद्ध 20 ओव्हरमध्ये 119 धावा केल्या होत्या. भारतानं त्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केलं होतं.


संबंधित बातम्या :



Team India: हार्दिक पांड्या की सूर्यकुमार यादव, टी 20 मध्ये भारताचा कॅप्टन कोण होणार? आकडेवारी नेमकी कुणाच्या बाजूनं?