बर्मिंगहॅम : विश्वचषकाच्या साखळी सामन्यात यजमान इंग्लंडने टीम इंडियाचा 31 धावांनी पराभव केला. या विश्वचषकातला टीम इंडियाचा हा पहिलाच पराभव  ठरला. रोहित शर्माचे शतक आणि विराट कोहलीचे अर्धशतक तसेच हार्दिक पांड्याची जिगरबाज खेळी या पराभवामुळे व्यर्थ ठरली. या विजयानंतर  इंग्लंडच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम राहिल्या आहेत.


इंग्लंडने दिलेल्या 338 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर लोकेश राहुल भोपळाही न फोडता बाद झाला. यानंतर रोहित शर्माने कर्णधार विराट कोहलीसोबत शतकी भागीदारी करत संघाला सावरले. विराट कोहली (66) धावा करून बाद झाला. यानंतर सुरुवातीला धीम्या गतीने खेळत असलेल्या रोहित शर्माने वेगाने धावा करत आपले वर्ल्डकपमधील  तिसरे शतक साजरे केले. शतक झळकावल्यानंतर रोहित 102 धावांवर बाद झाला.  विजय शंकरच्या जागी संघात स्थान मिळालेल्या रिषभ पंतने (32) धावांची खेळी केली.

यानंतर हार्दिक पटेलने धोनीच्या साथीने वाढलेल्या धावांचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र फटकेबाजी करण्याच्या नादात तो (45) बाद झाला. धोनीने (42) तर केदार जाधवने (12) धावा केल्या. इंग्लंडकडून लीम प्लंकेटने तीन तर क्रिस वोक्सने दोन विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी जॉनी बेअरस्टोचे शतक आणि बेन स्टोक्स, जेसन रॉयच्या अर्धशतकांच्या बळावर यजमान इंग्लंडने सात बाद 337 धावांपर्यंत मजल मारली होती. जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉयने  160 धावांची शतकी सलामी देत इंग्लंडच्या धावसंख्येचा पाया मजबूत केला होता.  जेसन रॉय 57 चेंडूंत 66 धावा करुन बाद झाला होता. मग बेअरस्टोनं ज्यो रूटच्या साथीनं इंग्लंडच्या डावाला गती देत त्यानं वन डे कारकीर्दीतलं आपलं आठवं शतक साजरं केलं. त्यानं 90 चेंडूत आठ चौकार आणि सहा षटकार ठोकून शतकाला गवसणी घातली. तर 109 चेंडूत 111 धावांची खेळी केली.

बेन स्टोक्सने जो रुटच्या साथीने अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव पुन्हा एकदा सावरला. शमीनेच रुटचा अडथळा दूर करत भारताला आणखी एक यश मिळवून दिलं.  दुसऱ्या बाजूने स्टोक्सने फटकेबाजी सुरु ठेवत इंग्लंडला 300 धावांचा टप्पा ओलांडून दिला.  भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेतल्या.  कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1-1 विकेट घेऊन त्याला चांगली साथ दिली होती.