फ्लोरिडा : भारत आणि कॅनडा (IND vs CAN) यांच्यातील टी 20 वर्ल्ड कपमधील (T World Cup 2024) मॅच पावसामुळं मैदान ओलं असल्यानं रद्द करण्यात आली आहे. मैदानाची पाहणी केल्यानंतर पंचांनी हा निर्णय घेतला. भारत विरुद्ध कॅनडा मॅच रद्द झाल्यानं दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. ही मॅच रद्द झाल्यानं भारताला आणि कॅनडाला स्पर्धेतील पुढच्या फेरीतील प्रवेशावर काही परिणाम होणार नाही. मात्र, कॅनडा सारख्या नवख्या संघाला भारतासारख्या दिग्गज संघाविरुद्ध क्रिकेट खेळण्याच्या संधीला मुकावं लागलं. मॅच रद्द झाल्यानंतर कॅनडाचे खेळाडू विराट कोहलीसोबत फोटो काढताना पाहायला मिळाले. 


फ्लोरिडातील पूरस्थिती आणि पावसामुळं अमेरिका आणि आयरलँड यांच्यातील 14 जूनला होणारी मॅच रद्द झाली होती. ही मॅच रद्द झाल्यानं अमेरिकेनं सुपर 8 मध्ये प्रवेश केला. तर पाकिस्तानच्या संघाला टी 20 वर्ल्ड कपबाहेर जावं लागलं. आज देखील भारत आणि कॅनडा मॅच रद्द करावी लागली आहे. फ्लोरिडामध्ये काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळं मैदान ओलं असल्यानं आजची मॅच देखील रद्द करावी लागली. 


भारताचा पुढचा सामना अफगाणिस्तान विरुद्ध


भारताचा ग्रुप स्टेजमधील अखेरचा सामना आता रद्द झाला आहे. भारतानं यापूर्वीच्या तीन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानं सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारतानं आयरलँड, पाकिस्तान आणि अमेरिकेला पराभूत केलं आहे. या कामगिरीच्या जोरावर त्यांनी टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. अ गटातून भारतासह अमेरिकेनं देखील सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. 


भारताचा सुपर 8 मधील पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध 20 जूनला होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार ही मॅच रात्री  8 वाजता सुरु होईल. भारताचा सुपर 8 मधील दुसरा सामना ड गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघा विरुद्ध होईल. ड गटातून बांगलादेश किंवा नेदरलँड सुपर 8 मध्ये प्रवेश करु शकते. ही मॅच 22 जूनला होणार आहे. 


भारताचा सुपर 8 मधील तिसरा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मॅच 24 जूनला होणार आहे. 


सुपर 8 मध्ये विराट कोहलीला फॉर्म गवसणार?


विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ग्रुप स्टेजमध्ये भारताच्या डावाची सुरुवात केलेली आहे. विराट कोहलीला पहिल्या तीन मॅचमध्ये समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. विराटला तीन मॅचमध्ये केवळ पाच धावा करता आल्या आहेत. सुपर 8 मध्ये भारतीय संघासाठी विराट कोहलीचं कमबॅक महत्त्वाचं असणार आहे.


संबंधित बातम्या : 


Pakistan : पाकिस्तान टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर, पीसीबी मोठं पाऊल उचलणार, खेळाडूंचे पगार कापणार?


Shubman Gill : टीम इंडियात नेमकं काय चाललंय? शुभमन गिलनं रोहित शर्माला अनफॉलो केल्यानं खळबळ